Nashik News : नाशिकमधील (Nashik) अनाधिकृत आश्रमांचा (Adhar Ashram) मुद्दा सध्या राज्यभर चर्चेत आहे. म्हसरूळ परिसरातील (Mhasrul) ज्ञानपीठ आश्रमात संचालकाने तब्बल 7 मुलींवर लैंगिक अत्याचार (Molestation) केले आहेत तर त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwer) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या आधारतीर्थ आश्रमात साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा खून (Murder) झाला. दरम्यान केंद्रीय बाल हक्क आयोगाकडूनही या दोन्ही घटनांची दखल घेतली गेलेली असतांनाच त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमाबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महामार्गावर अंजनेरीजवळ (Anjneri) असलेलं आधारतीर्थ आश्रम हे काही दिवसांपूर्वी एका खूनाच्या घटनेमुळे चांगलंच चर्चेत आलं होतं. आश्रमातील एका साडेतीन वर्षीय चिमुकल्याची त्याच आश्रमातील एका साडेतीन वर्षीय मुलाने हत्या केली होती. दरम्यान याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच हा आश्रमच बेकायदेशीरपणे चालवला जात असल्याची चर्चा असतांनाच महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या नावाने हा आश्रम सुरु होता मात्र यातील एकूण 96 मुलांपैकी अनेक मुला मुलींचे पालक हे जीवंत आहेत तर 70 टक्क्यांहून अनेक मुलांचे पालक हे शेतकरीही नाहीत. विशेष म्हणजे महिला व बालविकास विभागाची देखिल आश्रमाला परवानगी नसून त्यांनी देखिल पोलिसांकडे कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे.


महिला व बाल विकास विभागाकडून देखील तक्रार आली आहे, आश्रमाला परवानगी नाही. आत्महत्या ग्रस्त शेतकरी मुलांच्या नावाने आश्रम असून एकूण 96 मुले मुली आहेत. यातील अनेक मुलांना पालक आहेत, काहींना एक वडील किंवा आई आहेत. पालकांना बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात मुलांना देण्यात आल आहे, ईतर तपास सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानूसार बाल विभाग आणि पोलिसांचे पथक तयार करण्यात येऊन ईतर आश्रमाची तपासणी करणार असल्याचे  अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले. 


एकूणच काय तर गेल्या अनेक वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या नावाखाली पैसा गोळा करण्याचा धंदाच या आश्रमाच्या माध्यमातून सर्रासपणे सुरु करण्यात आला होता ज्याकडे ना पोलिसांचे लक्ष होते ना महिला व बाल विकास विभागाचे. विशेष म्हणजे अजूनही या आधारतीर्थ  आश्रमचालकांविरोधात कुठली कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतय. नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरातील सात विद्यार्थिनीवर बलात्कार झालेला ज्ञानपीठ आश्रम देखिल बेकायदेशीर पणे सुरु असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं असून या दोन्ही आश्रमाची थेट केंद्राकडूनही गंभीर दखल घेण्यात आलीय, केंद्रीय बाल हक्क आयोगाचे पथक बुधवारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी सखोल चौकशी सुरु केली आहे. 


आधारतीर्थ आणि ज्ञानपीठ या दोन्ही आश्रमांच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ईतर आश्रमांची देखिल प्रशासनाकडून झाडाझडती घेतली जाणार आहे मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतोय की राज्यात अशाप्रकारे किती आश्रम अनाधिकृतपणे सुरु आहेत ? आणि त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 


आणखी वाचा :
Nashik Crime : नाशिक आश्रम प्रकरण : संशयित हर्षल मोरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी