Nashik Asaduddin Owaisi : भारताच्या संविधानानुसार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करता येते. मात्र जिथे जिथे भाजप सत्तेत आहे, तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवलेला आहे. पण जर कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवाद करत असल्याचा सवाल असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सरकारला विचारला आहे. 


असदुद्दीन ओवेसी हे कालपासून नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लव जिहाद कायद्याविषयी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले की, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आपला देश संविधानावर चालतो आहे. त्यामुळे संविधानानुसार कोणीही आपल्या आवडीनुसार विवाह करू शकता, फिरू शकता. मात्र भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे, त्या ठिकाणी लव्ह जिहादचा कायदा बनवला जात आहे. मात्र जे कोणी लव जिहाद म्हणत आहेत असे किती लोक भाजपमध्ये आहेत त्यांनी अशी लग्न केली आहेत. मग तेव्हा कायदा कसा अवलंबणार? असा सवाल करत हा कायदा बेकायदेशीर असल्याचे ओवेसी म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, संविधानानुसार प्रत्येक जणआपलं आयुष्य जगत आहे. त्यांना विवाह करण्याची परवानगी देखील संविधान देतं, मग कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचे रूप दिले जात आहे. लव जिहादविषयी महाराष्ट्र मोर्चे निघत आहेत. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार? तसेच धर्मपरिवर्तन बाबत जुना कायदा आहेच. ज्यांना जे आवडतंय ते करू द्या. आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर भर देणे आवश्यक असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच औरंगजेब बाबत राष्ट्रवादी आणि भाजपलाच विचारा असे म्हणाले. तर ईडीच्या कारवाया या भाजप काळात सर्वाधिक होत असून राज्यासह देशात इतरही विषय आहेत. तरुणांना नोकरी द्या, महागाई कमी करा, तुम्हाला फक्त नावाचं पडलंय, कामाचे काही नाही. हा राज्यकर्त्यांचा हा नाकर्तेपणा असल्याचे ओवेसी म्हणाले. 


दरम्यान प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याच्या मुद्दयांवर ते म्हणाले की, तो सर्वस्वी प्रकाश आंबेडकरांचा निर्णय असून आम्ही बाळासाहेबांचा आजही, उद्याही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू?  आम्ही आज पण बाळासाहेब आंबेडकरांचा आदरच करतो, त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले. तर सम्मेत शिखरजी तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा काढण्यात यावा, या मागणीवर आम्ही जैन धर्मियांसोबत आहोत. प्रत्येक समाजाची एक आस्था असल्याचे ते म्हणाले. तर यावेळी ओवेसींनी अजित पवारांच्या वक्तव्यावरून होत असलेल्या वादावर बोलणे टाळले. 


सोबतच काल औरंगाबाद मध्ये बोलताना ओबीसी म्हणाले की नोटबंदीवरुन सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आम्हाला मान्य नाही आम्ही आदराने त्या निर्णयाशी असहमती दर्शवितो. सरकार नोटबंदीचा दिवस का साजरा करत नाही, तो दिवस पण साजरा करायला हवा . नोट बंदीच्या आधी भारताचा जीडीपी 8.3 टक्के होता आता, तो चार टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे मत ओवेसी यांनी मांडले.