Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 132वी जयंती. आज भारतातच (India News) नव्हे तर जगभरात डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे. नाशिक (Nashik News) म्हटलं ऐतिहासिक वारसा लाभलेली नागरी आहे. याच नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिराच्या (Kalaram Mandir) सत्याग्रहासह अनेक आठवणी आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाशिक शहर आणि जिल्ह्याशी खास नात असल्याचं सांगितलं जातं.


आज मोठ्या उत्साहात 14 एप्रिल दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक शहराशी संबंधित अनेक प्रसंग, घटना सांगितल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे, काळाराम मंदिर सत्याग्रह होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले, त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी अनेक लढे दिले. अनेक आंदोलनापैकी नाशिकचं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे महत्वाचे आंदोलन होते. फक्त हिंदूंनाच नव्हे तर त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मुलभूत हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 रोजी सुरु झाला आणि पुढील पाच वर्ष चालला. यानंतर दलितांना मंदिर प्रवेश मिळाला. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही काळाराम मंदिराची पायरी चढली नाही. 


त्यानंतर लागलीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथील सभेत 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही', ही घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली आणि एका ऐतिहासिक धर्मक्रांतीला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी म्हणजेच, 13 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूर येथील दीक्षाभूमीवर 14 ऑक्‍टोबर 1956 ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो. 


तर नाशिकमधीलच नाशिकरोड हा भाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत जवळचा होता. नाशिकरोड भागात असलेले बौद्ध विहार आजही याची साक्ष देते. नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील बौद्धविहाराची स्थापना 1937 ला झाल्याची नोंद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1947 ला रेल्वे स्टेशनवर पंजाब मेल या रेल्वेने आले होते. रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या बौद्ध स्मारक येथे डॉक्टर आंबेडकरांनी वास्तव्य केले होते. या ठिकाणी अनेक वेळा चळवळीतील कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी एकत्र जमून विचारविनिमय करीत. त्याचबरोबर नाशिकरोड भागात असलेल्या नोट प्रेसच्या कामगारांसंदर्भात देखील बैठक घेतल्याचे सांगितले जाते. कामगारांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी डॉ. आंबेडकर यांना कामगारांनी येथे बोलविले होते. प्रेसमधील कामगारांच्या वेतनवाढी संबंधी आंबेडकर यांनी विचारविनिमय सभा घेतली होती. या वेळी कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला योग्य मिळायला हवा, कामाच्या ठिकाणी सुविधा दिल्या गेल्या पाहिजे, असा आग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धरला होता.


तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. 18 जानेवारी 1928 रोजी संत निवृत्तीनाथांची यात्रा सुरू होती. दुपारच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिराच्या अगदी समोर संत चोखोबा मंदिर आहे. यावेळी बाबासाहेब हे पोहचले होते. डॉ. बाबासाहेबांना पाहण्यासाठी यावेळी गर्दी उसळली होती. बाबासाहेबांनी उभारलेल्या चळवळीसाठी आपण काही देणे-लागतो, ही भावना लोकांमध्ये जागृत झाली. त्यावेळी उपस्थित लोकांनी आठ आण्यापासून, 1 रुपया, पंचवीस रुपये, पन्नास रुपये अशी मदत केली होती. एकूण 203 रुपये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीसाठी मदत गोळा झाली होती. अशा पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे अतूट नाते या सर्व घटनावरून दिसून येते.