Chhagan Bhujbal Letter To CM Eknath Shinde : नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) मोठा भ्रष्टाचार (Corruption) सुरू असल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवत भुजबळ यांनी ही मागणी केली आहे. बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भुजबळ यांनी केला आहे. 


जवळपास 200 कोटींच्या बेकायदेशीरपणे भूसंपादनाचे प्रयत्न सुरू असून, त्यावर स्थगिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेत सेवाजेष्ठता डावलून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नियुक्ती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आहे. सदर बदल्या रद्द केल्या पाहिजे, असे भुजबळ म्हटले आहेत. 


पत्रात काय लिहले आहे? 


अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "नाशिक महानगरपालिकेतील मागील भूसंपादन घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आता जवळपास 200 कोटींच्या बेकायदेशीरपणे भूसंपादनाचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संदर्भातील 30% रक्कम पाठवण्याची कार्यवाही सूरु आहे. सदर भूसंपादन करतांना उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तसेच 12 टक्के मासिक व्याज दराने सुरू आहे असे कारण दिले जात आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी अपिल केले नाही. आता अपिलाची मुदत संपली असे कारण दिले जात आहे. मात्र, महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय चुकीमुळे जर महापालिकेला आर्थिक फटका बसत असेल तर सर्व प्रकरण एकत्र करून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे आवश्यक आहे. तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भूसंपादनासाठी रकमा पाठवल्या जाऊ नये अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.


भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्यात यावी


तसेच, नाशिक महानगरपालिकेमध्ये मागील काळात मिसिंग लिंक भूसंपादन घोटाळा झालेला आहे. मिसिंग लिंक म्हणजे एखाद्या रस्त्याची दोन्ही बाजूने जागा संपादित झाली आहे, मात्र मध्येच एखादा पॅच बाकी आहे अशा जागेचे भूसंपादन, मिसिंग लिंकची संपूर्ण यादी राज्य शासनाकडे मागवून शासनाच्या पुर्व मान्यतेनंतरच भूसंपादनाची कार्यवाही होणे आवश्यक आहे. काही भूसंपादनांमध्ये जमीन मालकांनी आपले अधिकार अन्य व्यक्तीला दिलेले असतात. अशा प्रकरणांमध्ये मूळ मालकालाच मोबदला दिला जावा अशी तरतूद आहे. मात्र या तरतुदीकडे दुर्लक्ष केले जाते. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाची बदनामी होणार नाही याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने नाशिक शहरातील बेकायदेशीरपणे केली जात असलेली भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.


बेकायदेशीरपणे शैक्षणिक आरक्षण बदलले जात आहे 


नाशिक शहरातील गंगापूर रोडवर भागातील चोपडा हॉस्पिटललगत सर्व्हे क्रमांक 717  या भूखंडावर शैक्षणिक आरक्षण आहे. या शैक्षणिक प्रयोजन व लोकहितासाठी अडीच एकर क्षेत्रफळ असलेल्या आरक्षित भूखंडावरील मूळ आरक्षण रद्द न करण्यासाठी हरकती मागवण्यात आल्या आहेत. 119 कोटी रुपयांचा हा भूखंड असून मूळ शैक्षणिक आरक्षण हटवून त्यावर रहिवासी आरक्षण निश्चित केले जात आहे. मुळात ही जागा पुढील दहा वर्षासाठी महापालिकेच्या ताब्यात असणार आहे. त्या आधीच शैक्षणिक झोन रद्द करणे बेकायदेशीर असून त्यामुळे महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सुध्दा होणार आहे. जोपर्यंत ते आरक्षण व्यपगत होत नाही तोपर्यंत त्यावरील झोन वा त्याचे मूळ प्रयोजन बदलता येत नाही. मात्र काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने बेकायदेशीरपणे हे शैक्षणिक आरक्षण बदलले जात आहे. अशा पद्धतीने दहा वर्षाची मुदत संपण्यापूर्वी आरक्षण व त्याचे झोन बदलले जाऊ लागले तर चुकीचे पांयडे पडतील. तसेच महापालिकेचे मोक्याचे रिझर्वेशन हातातून जातील त्यामुळे सदर बेकायदेशीर आरक्षण बदलाला स्थगिती देऊन सदर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. 


बदल्यांमध्ये मोठे अर्थकारण झाल्याबाबत तक्रारी


त्याचबरोबर नाशिक महानगर पालिकेत सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे बदल्या करण्यात आल्याबाबत तक्रार आहे. नगररचना कार्यकारी अभियंता पदी संजय अग्रवाल यांच्या ऐवजी प्रशांत पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठे अर्थकारण झाल्याबाबत तक्रारी आहेत. पगार हे कनिष्ठ अधिकारी असून त्यांच्याकडे नगररचना विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची जबाबदारी कशी दिली गेली असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरणांमधून त्यांना नाशिकमध्ये अवघ्या दोन महिन्यापूर्वी आणले गेले व त्यानंतर त्यांना एकाच महिन्यामध्ये दोन मोठ्या पदांची जबाबदारी देण्यात असल्याचं भुजबळ यांनी म्हटले आहे.


सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्यांची चौकशी करा 


तसेच समीर रकटे हे कनिष्ठ अभियंता असताना नियमबाह्यपणे त्यांच्याकडे नगररचना तसेच बांधकाम विभाग उपअभियंता पदाचा पदभार दिला आहे. आता आचारसंहितेपूर्वी अंतर्गत फेरबदल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये बदल्या केल्या जात असून नगररचना व बांधकाम मध्ये नियुक्ती देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार आहे. यापूर्वीच्या विभागामध्ये काम केले असेल त्या विभागामध्ये पुन्हा नियुक्ती देऊ नये असे असताना बांधकाम व नगररचना या विभागामध्ये यापूर्वी काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच विभागात बदली देण्यात आली आहे. त्यामुळे सेवाजेष्ठता डावलून बेकायदेशीरपणे केलेल्या बदल्यांची चौकशी करून सदर बदल्या रद्द करण्यात याव्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


मालेगाव पॉवर कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात नागरिक आक्रमक, मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी