Nashik Agriculture News : यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा (Rain) तडाखा बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचं मोठं नुकसान (Crop Damage) झालं आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्याला देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे समोर आलं आहे. शेतकऱ्यांना जास्त मदत मिळावी, म्हणून निकष बदलल्याचे राज्य सरकारनं सांगितलं मात्र जास्तीची मदत सोडा या आधी जाहीर केलेली मदतच शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नसल्याचे समोर आलं आहे.


2 लाख 73 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका


नाशिक जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 73 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या मागणीकडे नेतेमंडळी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान भरपाईचे 240 कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका


यावर्षी सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी नारली होती. त्यानंतर मात्र, जुलै आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली होती. हाती आलेली पीक वाया गेल्यानं शेतकरी संकटात सापडला होता. सोयाबीन, कापूस, फळबागा या पिकांचे मोठं नुकसान झालं होते. शेती पिकांच्या नुकसानीसह काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. 


परतीच्या पावसाचा धुमाकूळ 


परतीच्या पावसानंही राज्यभरात धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीतून वाचलेली पीक या परतीच्या पावसानं वाया गेली. परतीचा पाऊस लांबल्यामुळं काढणीला आलेलं पीक आडवी झाली होती. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. 


सरकारकडून वाढीव मदतीची घोषणा 


जिरायतीच पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहा हजार 800 रुपये प्रती हेक्टर ऐवजी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13हजार 500 प्रती हेक्टर ऐवजी 27 हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहे. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार प्रती हेक्टर ऐवजी 36 हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोलले गेलं. मात्र, अद्याप पहिलीच मदत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Aurangabad: पालकमंत्री भुमरेंचा तालुका अतिवृष्टी नुकसानभरपाईतून वगळला, शेतकऱ्यांमध्ये संताप