Nashik Latest marathi News Update: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून नाशिक बस स्थानकामध्येच शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. लवकरच यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले. 


कोरोनानंतर महामंडळाने नाशिक सह परिसरात जाणाऱ्या सर्वच बससेवा नियमित पाने सुरू केल्या. त्याचपद्धतीने नाशिक इगतपुरी ही बसेसवा देखील सुरू करण्यात आली. त्यामुळे इगतपुरी हुन नाशिकला येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी मासिक, त्रैमासिक पास काढले. मात्र अनेकदा या बसेस सरळ नाशिक ते इगतपुरी अशी मार्गावर धावतात. ज्या की मधल्या थांब्यावर थांबणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याने आज विद्यार्थ्यांनी संतप्त होत आंदोलन छेडले.


नाशिक ते इगतपुरी अशी नाशिकच्या सीबीएस बसस्थानकावरून बससेवा सुरू आहे. या बसचा मार्ग हा नाशिकहून वाडीवऱ्हे व मार्गावरील काही गावांना थांबणे अपेक्षित आहे. मात्र असे होत नसल्याचे आरोप या मार्गावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. शिवाय दर एक तासाला बस असताना शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर बस कधीही निघून जाते. शिवाय मधल्या गावांना न थांबता थेट इगतपुरी गाठत असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा इगतपुरी नाशिक बसने वाडीवऱ्हेसह इतर गावे गाठावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 


दरम्यान बस वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना खासगी वाहनाचा अवलंब करावा लागतो. ही वाहने अव्वाच्या सव्वा भाडे आकरतात, मग आम्ही पास कशासाठी काढतो? असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत वारंवार इगतपुरीचे बस प्रशासन, आमदार, लोकप्रतिनिधी यांना समस्येबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर इगतपुरी नाशिक वाहतूक नियंत्रकांना व विभागीय कार्यालयात निवेदन दिले.  मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे आज संतप्त होऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


यावेळी विद्यार्थ्यांनी बसेस रोखून धरल्या. वाहतूक नियंत्रकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विद्यार्थ्यांकडे धाव घेतली. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा सांगूनही अधिकारी 'उद्यापासून होईल, लवकरच सुरू होईल' अशी आश्वासने दिली जातात, मात्र होत काहीच नाही. यावेळी तातडीने दोन बसेस संबंधित मार्गावर सोडण्यात आल्या, मात्र विद्यार्थ्यांच्या मते हे कायमस्वरूपी होणं आवश्यक असून आज सोडल्यात उद्या पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होणार असे विद्यार्थी म्हणाले.