Rabi Season : यावर्षी राज्यात परतीच्या पावसाचा (Rain) खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता दुसरीकडं रब्बी हंगामात (Rabi Season) शेतकऱ्यांसमोर विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे ग्रामीण भागात खराब झालेले ट्रान्सफॉर्मर तर दुसरीकडे वीज बिले न भरलेल्या शेतकऱ्यांसमोर विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा दुहेरी संकटात नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकरी अडकला आहे.


तोडलेलं वीज कनेक्शन जोडण्याची शेतकऱ्यांची मागणी


परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळं खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा या रब्बी हंगामाकडं लागल्या आहेत. आता काही दिवसातच रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. तर काही ठिकाणी पेरणीला सुरुवात देखील झाली आहे.  अशा स्थितीत शेतकऱ्यांसमोर विजेची समस्या निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांचा हातून गेला आहे. आता आशा लागली आहे ती रब्बी हंगामाची मात्र रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, विजेचा समस्या निर्माण झाल्या आहेत. पेरणी नंतर पाण्याची आवश्यकता असते.  काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारांची चोरी झाली आहे. हे संकट असताना थकबाकीदार शेतकऱ्यांचे विद्युत वितरण कंपनीने चार महिन्यापूर्वी तोडलेले विज कनेक्शन अशा अनेक बाबी रब्बी हंगामासाठी अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी विजेचा प्रश्न आणि इतर प्रश्न सोडवण्याची मागणी रब्बी हंगामाच्या पेरण्या अगोदर केली आहे.


विजेच्या तार आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटना वाढल्या


नंदूरबार जिल्ह्यातला शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने भरडला जात आहे. शहादा तालुक्यातील करंजाई परिसरात वीजतारांची चोरी आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटनांनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिसरातील दहा ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल आणि 20 ते 22 खांबावरील विजांच्या तारांची चोरी झाली आहे. परिणामी रब्बी हंगामाच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडं जिल्ह्यात परतीचा पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता पावसानंतर जिल्ह्यात अनेक भागात दाट धुके दिसून येत आहे. त्यामुळे कांदा, मिरची पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. धुके पडल्यानंतर कांद्याच्या पातीवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा होऊन होऊन सडून खराब होत असते तर मिरचीवर दवबिंदू जमा होऊन डाग पडून प्रतवारी कमी होत असते. याशिवाय धुक्यामुळे कापसाचे फुल फुगडी गळत असून जवळपास खरीप हंगामातील सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात याचा फटका बसून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.