नांदेड : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबायला तयार नाहीत. आता पुन्हा एकाच दिवशी दोघांनी बँकेचे कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून जीवन संपवलं आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते आणि परभणीच्या (Parbhani) जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील विलास रामराव रोकडे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. 


नांदेडच्या आदमपूर येथील हज्यपा मष्णाजी झेलते या शेतकऱ्याने नापिकी व कर्जामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी (5 नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली आहे. हज्यपा मष्णाजी झेलते हा अल्पभूधारक शेतकरी आहे. तसेच शेतमजूरी करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अती तर कधी कमी पावसामुळे शेतातील पिके वाया गेली. त्यामुळे शेतातील पिकांवर काढलेले कर्ज कसे फेडायचे या तणावात हज्यपा असायचे. दरम्यान, शनिवारी घरातील सर्वजण रात्री राहत्या घरी झोपी गेला. यानंतर रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातील सर्वजण गाढ झोपेत असतानाच त्याने घरातच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. सकाळी उठल्यावर घरच्यांना हज्यपाने आत्महत्या केल्याचे समजले. 


परभणीत देखील शेतकरी आत्महत्या...


दुसरी आत्महत्या परभणीच्या जिंतूर शहरातील पाटील विहीर परिसरातील समोर आली आहे. विलास रामराव रोकडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीनच्या उतारात मोठी घट आली आहे. त्यामळे येणारी दिवाळी कशी साजरी करायची?, बँकेचे कर्ज कसे फेडायचे?, संसाराचा गाडा कसा चालवावा?, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, पिकाचा खर्च, तसेच औषधाची उधारी कशी फेडायची? अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. या विवंचनेतन त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 


परिस्थिती भयंकर...


मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच यंदा काही तरी हातात येईल अशी अपेक्षा असतांना पावसाने पाठ फिरवली आणि अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. हिवाळ्यात अशी अवस्था असून, उन्हाळ्यात परिस्थिती भयंकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आत्तापासून पाण्याचे नियोजन करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असून, त्यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Farmer Suicide : औरंगाबाद हादरलं! एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या, दोघांनी विष तर एकाने घेतला गळफास