नांदेड : लोहा तालुक्यातील सुगाव येथे तब्बल गेल्या 62 वर्षापासून ची 'एक गाव, एक गणपती' ही परंपरा आजतागायत गावकऱ्यांनी जपली आहे. तीन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असणाऱ्या सुगाव येथील  गावकऱ्यांनी 1962 मध्ये 'श्री' ची मातीची मूर्ती बनवून गणेशोत्सवाला सुरुवात केली. तत्कालीन सरपंच मोहनराव पाटील सुगावकर यांनी व त्यांच्या साथीदारांनी 'श्री यशवंत गणेश मंडळाची' स्थापना केली. ज्याला आज सहा दशके उलटली असून तेव्हापासून 'एक गाव, एक गणपती' ची परंपरा गावात आजतागायत सुरू आहे.


 पर्यावरणपूरक लाल मातीची मूर्ती हे येथील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. गावातील चार जाती धर्मातील लोक, मुस्लिम, मराठा, कोळी, सुतार हे एकत्र येत ही बाप्पाची मूर्ती घडवतात व तिची प्राणप्रतिष्ठा करतात. सुगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नरंगल येथील डोंगरावरील मूर्ती घडवण्याची माती गावातील मुस्लीम समाजातील बाबू शेख यांच्या कुटुंबातील व्यक्ती माती आणण्याचे काम गेल्या 62 वर्षांपासून करत आहेत. तर गावातील मूर्तीकार म्हणून नामदेव लोखंडे, उत्तम यमुलवाड, शिवानंद पांचाळ हे तीन जाती धर्मातील लोक लाल मातीची गणरायाची मूर्ती तयार करतात. यासाठी लागणारी लाल माती मुस्लिम बांधव हबीब शेख हे श्रद्धेने कुठलाही मोबदला न घेता देतात गणेश चतुर्थीला गावात घरोघरी मातीचीच मूर्ती बनवून पुजली जाते.




 गावात एकच गणपती बसवून या गणेश उत्सवामध्ये सर्व धर्मीयांचा समावेश असतो त्यात विविध जातीच्या अकरा मानकऱ्यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे कोणाकडून ही देणगी न घेता अकरा मानकऱ्यांकडून त्यांच्या वैयक्तिक खर्चातून सकाळ- संध्याकाळची पूजा, आरती, प्रसाद व दिवाबत्ती यथाशक्ती अकरा दिवस केली जाते. यामध्ये सर्व जाती धर्मातील समाज बांधवांचा समावेश असतो. या उत्सव काळात गावातील रस्ते परिसर श्रमदानातून साफसफाई केली जाते. अनेक जण व्यसन सोडण्याची शपथ घेतात. 




गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात भजन, कीर्तन, बालनाट्ये, भारुड विविध गुणदर्शन, मुलांचे भाषणे, दशावतारी सोंग, पारंपारिक राजा श्रियाळ आख्यान, स्त्री - भ्रूणहत्या विरोधी जनजागृती व महिलांचे सक्षमीकरण, रक्तदान, आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा केला जातो. तर उत्सव कालावधीत दहा दिवस दोन वेळच्या महाप्रसादाचे आयोजन गेल्या 62 वर्षापासून सुगावकर करत आहेत. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांनी सुगाव येथील पर्यावरणपूरक व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या यशवंत गणेश मंडळाचा आदर्श घेणे गरजेचे आहे.