Nanded News: नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) किनवट, माहूर, उमरी, लोहा, कंधार, मुखेड, भोकर, हिमायतनगर, हदगाव या आदिवासी बहुल भागातील वाडी तांड्यावर, पाड्यावर वास्तव्य करणारा आदिवासी समाज अद्यापही जंगलातील नैसर्गिक साधन सामुग्रीवर आजतागायत आपला उदरनिर्वाह करत आहे. ज्यात मोहफुले, मध, धावंडा डिंक, टेंभी पत्ता, लाकूड, विविध वनौषधी आणि बिब्बा, टेंभरे, सीताफळ, घोटफळ या जंगली फळाची विक्री करून आपला संसाराचा गाडा हाकतात. पण काही फळे तितकीच विषारी आणि औषधी गुणधर्म असणारी व काळजी घेऊन तोडणी आणि फोडणी करावी लागतात. ज्यात जंगलाचा रानमेवा बिब्बा येतो. त्यामुळे टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही आदिवासी महिलांना जिवघेणा बिब्बा फोडण्याचा उद्योग करावा लागतोय.


नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील भोईगल्लीत वर्षभर बिब्बे फोडण्याचं काम सुरु असते. या बिब्बा फोडणी व्यवसायातूनच अनेक महिलांना रोजगार मिळतोय. काजू वर्गीय फळ असणारा बिब्बा जितका आरोग्यदायी तितकाच विषारी पण आहे. कारण बिब्बा झाडाचे फळा व्यतिरिक्त या झाडाचे लाकूड, पाने आणि अगदी सावलीही बसण्यासाठी योग्य नसते. कारण हे लाकूड ठिसूळ असते, तर त्यातूनही तेल निघत असल्याने ते उतून जखम होण्याची भीती असते. तसेच त्याच्या सावलीनेही त्वचेवर पुरळ उठून हानी होऊ शकते. पण त्याला लागणारे फळ आणि त्याचे बी म्हणजे बिब्बा हा तितकाच आरोग्यदायी आहे.


बिब्बा फोडणाऱ्या तरुण मुलींच्या भविष्यावर परिणाम 


लोहा येथील भोई गल्लीतील या महिला अत्यल्प रोजगारावर गेल्या अनेक वर्षापासून बिब्बा फोडण्याचा जीवघेणा व्यवसाय करत आहेत. बिब्बा फोडणे हे वयस्कर महिलांसाठी जरी त्रासदायक नसलं, तरी तरुण मुलींच्या भविष्यावर मात्र याचा परिणाम होतो. दरम्यान गोडंबी हे नाव कानावर पडलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. बिब्या पासून तयार होणारं गोडंबी हे विशेषत: हिवाळ्यात सुका मेवा म्हणून वापरली जाते. हिवाळ्यात आरोग्यवर्धक सुका मेवा बनवण्यासाठी गृहिणी काजू, बदाम, पिस्तासह गोडंबीचा प्रामुख्याने उपयोग करतात. काजू, बदाम व पिस्ता या सुक्या मेव्यात जेवढे औषधी गुणधर्म आहेत, तेवढेच अथवा त्यापेक्षा जास्त औषधी गुणधर्म बिब्या पासून तयार झालेल्या गोडंबीत आहेत. पण गरिबांचा बदाम काजू असणारा हा रानमेवा तयार करण्याचे हे काम तेवढेच जिकरीचे आहे.


बिब्बे फोडणाऱ्या महिलांना मिळतात दीडशे ते दोनशे रुपये 


बिब्यापासून गोडंबी वेगळी करण्याचे काम अत्यंत जिकरीचं असत, ज्यात बिबा फोडत असताना त्यातून अंगावर उडणाऱ्या हानिकारक तेलामुळे अनेक महिलांना जखमा होतात. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर या गोडंबीला मोठी मागणी आहे. तसेच बिब्यांचा पुरवठा मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांतून होतो. 50 रुपये किलोप्रमाणे बिब्यांची खरेदी केली जाते. हे बिब्बे फोडल्यानंतर मिळणाऱ्या गोडंबीची 500 ते 600 रुपये किलो दराने विक्री केली जाते. मात्र बिब्बे फोडणाऱ्या या महिलांच्या हातात फक्त दीडशे ते दोनशे रुपये पडतात. काळ्या बिब्यातील गोडंबीला वेगळं केल्यानंतर उरलेल्या टरफलातून तेल काढलं जातं. हे तेल मानवी त्वचेसाठी हानिकारक असलं तरी, लाकडी दरवाजांना, कातडी चप्पलांना लावण्यासाठी व ऑईलपेंट निर्मितीसाठी वापरलं जातं. पण गावरान मेवा समजल्या जाणाऱ्या या बिब्याच्या फोडणी व्यवसायासाठी या आदिवासी महिलांना ना शासनाची आर्थिक मदत मिळते ना परिपूर्ण रोजगार मिळतो.


इतर महत्वाच्या बातम्या: 


50 क्विंटलच्या भाकरी, 250 क्विंटलची भाजी, नांदेडमधील बारालिंग देवस्थानाची भाजी-भाकरीची 200 वर्षांची परंपरा