नांदेड : जिल्ह्यातील प्रत्येक घरांना नळांने पिण्याचे पाणी पोहोचावे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने “हर घर नल से जल” ही योजना सप्टेंबर 2020 पासून सुरू केली. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत (Nanded Zilla Parishad) राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून सुमारे 1 हजार 234 योजनांद्वारे हे काम सुरू होते. मात्र, यातील सुमारे 387 योजनांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी (Contractor) कामाची गती संथ व दिरंगाईने सुरू ठेवल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा बडगा अखेर जिल्हा परिषदेने उचला आहे. यात 387 कंत्राटदारांना अटी व शर्तीनुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा जितका अधिक विलंब लागेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाला 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. या कंत्राटदारा व्यतिरिक्त 15 कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरूच न केल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकले आहे. 


नांदेड जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे हे काम दिलेल्या अटी व शर्तीनुसारच व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एक स्वतंत्र समिती नेमली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा अधिकारी या सदस्यांची ही समिती होती. या समितीने जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यात 387 कंत्राटदारांसह इतर 15 कंत्राटदार यांचा निष्काळजीपणा उघड झाल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना सादर केला होता. त्यांनी तो जशास तसा स्विकारून कारवाईवर शिक्कामोर्तब केले. 


कंत्राटदारांमध्ये खळबळ...


केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून “हर घर नल से जल” ही योजना सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील गावागावात ही योजना राबवली जात आहे. तर जिल्हा परिषदेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून सुमारे 1 हजार 234 योजनांद्वारे हे काम सुरू होते. मात्र, अनेक कंत्राटदारांनी हे काम ठरलेल्या वेळेत पूर्ण केले नाही. तरम काहीने अति संत गतीने हे काम केले आहे. विशेष म्हणजे यातील 15 कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरूच केले नसल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


रितसर प्रक्रिया पूर्ण करून दिले कामं...


“हर घर नल से जल” या संकल्पनेतून जिल्ह्यातील 1 हजार 540 गावात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन दर दिवशी 55 लिटर शुद्ध पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सदर उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रितसर प्रक्रिया पूर्ण करून हे काम कंत्राटदारांना बहाल केले होते, अशी माहिती देखील जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nanded : चुकीचा फेरफार केला, कपाळावरचं कुंकू पुसलं, पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या तलाठ्याचा बँड लावून जाहीर सत्कार, पीडित महिलेने छापली पत्रिका