नांदेड : मागील काही दिवसांपासून सतत पीक विमा कंपन्यांबाबत (Crop Insurance Company) अनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, यावरूनच कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा संताप पाहायला मिळाला आहे. पीक विमा (Crop Insurance) लाभ वितरित करताना कोणते निकष लावले? मोजक्याच शेतकऱ्यांना जसा लाभ दिला तसा सर्वांना द्या. नाही तर कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करतो, असा इशाराच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर झालेल्या बैठकीत धनंजय मुंडेंनी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांवर धारेवर धरल्याचं पाहायला मिळाले. 


युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून विमा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुंबईत आंदोलन केले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. हदगाव तालुक्यात 80 हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला असून, 40 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या याच बैठकीत धनजय मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. मोजक्या शेतकऱ्यांना तुम्ही विमा मंजूर केला, त्याच निकषानुसार इतरांनाही विमा द्या. अन्यथा मी कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करेल, अशी ताकीद देखील मुंडे यांनी दिली. तसेच, याबाबत पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार असल्याचं देखील मुंडे म्हणाले आहेत. 


बैठकीत यांची उपस्थिती...


दरम्यान, मुंबईत पार पडलेल्या या बैठकीस मंत्री संदिपान भुमरे, खासदार हेमंत पाटील, बाबुराव कदम, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विभागीय कृषी आयुक्त आवटे, जिल्हा कृषी अधिकारी बन्हाटे, हदगावचे शेतकरी नेते गजानन शिंदे व आत्माराम पाटील, शिवाजीराव जाधव, संदीप पालकर, नागोराव पाटील, अविनाश पाटील, रवीकुमार सूर्यवंशी, राजू पाटील आदी उपस्थित होते.


 शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्टवर...


काही दिवसांपूर्वी कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले होते,'स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सहभागी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कृषी उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय व देशातील महत्त्वपूर्ण कंपन्यां सोबत करार करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळेल. कृषी विभागामार्फत कृषी उत्पादनांची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी कंपनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना सर्व मदत देण्यात येईल. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार असल्याचे मुंडे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट