नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपला मांडीला मांडी लावून बसल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल दिली. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. आज (22 फेब्रुवारी) नांदेडमधील आयटीआय चौकात अमर राजूरकर यांचे चिरंजीव आशुतोष राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनरवर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा फोटो वगळण्यात आल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. 


प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून अशोक चव्हाणांचा पराभव  


2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाण यांचा पराभव करून नांदेड लोकसभेवर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात राजकीय वैर आलं होतं. मात्र, आता अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्याने या दोघांमध्ये एकाच पक्षातील सहकारी म्हणून राजकीय गोडवा पाहायला मिळेल अस वाटत असतांना या बॅनरबाजीवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 


प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून प्रतिक्रिया देण्यास नकार 


आशुतोष राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावल्यानंतर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपमध्ये अशोक चव्हाण यांचे स्वागत झाले, असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम राहणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 


शिवाजीराव मोघेंनी अशोक चव्हाणांविरोधात शड्डू ठोकला


दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसने नांदेडमध्ये  आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने ज्या पाच जागा निवडून येतील त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल. नांदेडची जागा काँग्रेसच जिंकेल, असे शिवाजीराव मोघे म्हणाले आहेत.  शिवाजीराव मोघे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने ज्या पाच जागा निवडून येतील त्यात नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल, नांदेडच्या जागा काँग्रेस जिंकेल, अशोक चव्हाण भाजपत गेल्याने काँग्रेसवर कोणताही परिणाम होणार नाही. विनाकारण ते भाजपत गेले अशी टीकाही यावेळी मोघे यांनी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या