नागपूर : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत (Shivsena) पडलेली फूट आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतच्या राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्यात (State Politics) पक्षाच्या विस्ताराच्या तयारीत मनसे असून विदर्भात पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns raj thackeray) अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज नागपुरात (Nagpur) आगमन झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर जल्लोषात त्यांचे स्वागत केले. गेल्या तीन दिवसांपासून राज ठाकरेंचे विश्‍वासू संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि राजू उंबरकर दौऱ्याच्या तयारीसाठी नागपुरात तळ ठोकून आहेत.


गेल्या तीन दिवसांपासून रवी भवन (Ravi Bhavan Nagpur) येथे या नेत्यांनी नागपूर, चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि राज ठाकरेंची भूमिका आगामी निवडणुकांविषयी (Elections) काय आहे, हे कार्यकर्त्यांना सांगितले. या तिन्ही दिवसांत कार्यकर्त्यांनी नेत्यांना एक प्रश्‍न केला. तो म्हणजे 'गेल्या 15 वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले?' वारंवार येणाऱ्या या प्रश्‍नाने नेत्यांना भंडावून सोडले. आता खुद्द राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांच्या या प्रश्‍नाचा सामना करावा लागेल, असं दिसतंय.


पक्षाचे सुरुवातीपासूनच विदर्भाकडे दुर्लक्ष!


मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील 15 वर्षांत फक्त 15 सभा जरी विदर्भात घेतल्या असत्या तरी पक्षावर ही वेळ आली नसती असे विदर्भातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेला विदर्भात पुन्हा पुनजिर्वित करण्यासाठी राज ठाकरे आज नागपुरात दाखल झाले. नागपूरच नव्हे तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यालाही ते भेटी देणार आहे. सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार आहेत. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर येथील महापालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. महानगरपालिका निवडणूक मनसे ताकदीने लढणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले.
 
आम्ही मनसेत टिकून आहोत ही पक्षासाठी उपलब्धी


राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील नेते राजू उंबरकर (Raju Umbarkar) हे तीन दिवसांपूर्वीच नागपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत आनंद एंबडवार हे सुद्धा आले आहेत. नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. त्यांच्याकडून राजकीय परिस्थिती जाणून घेतली. मुंबईवरून आलेले पदाधिकारी बैठकांमध्ये पंधरा वर्षांत तुम्ही पक्षासाठी काय केले, पक्ष वाढला का नाही, इतकी अधोगती का झाली असे सवाल करीत आहेत. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते फारच अस्वस्थ झाले आहेत. त्यांना काय उत्तर द्यावे हेच सूचत नाही. उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमतही नाही. जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेत टिकून आहेत हीच मोठी पक्षासाठी उपलब्धी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.


विदर्भासह नागपूरही वाऱ्यावर


संघभूमी असल्याने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात (National Politics) नागपूरचे महत्त्व आहे. मात्र आजवर मनसेच्या एकाही वरिष्ठ नेत्यांने विदर्भात लक्ष घातले नाही. पाठबळ दिले नाही. निवडणुकीची तयारी करून घेतली नाही आणि कोण जिंकले, पराभूत झाले याची साधी विचारणाही केली नाही. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) हीच शहरे मनसेच्या अजेंड्यावर होती. त्यामुळे विदर्भात कोणीच लक्ष घातले नाही. पंधरा वर्षांत झालेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात जरी मुंबईतून लक्ष घातले असते आणि राज ठाकरे वरचेवर येत राहिले असते तरी पक्ष जिवंत राहिला असता. ही अवस्था झाली नसती असे स्थानिकांचे खासगीत म्हणणे आहे.