मुंबई : "अनलॉकसंदर्भात अंतिम मसुदा तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे, त्यांची मंजुरी मिळाली की दुपारपर्यंत अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमावली लागू होईल," अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. नागपूरमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे या नियमावलीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारने दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.


विजय वडेट्टीवार यांची घोषणा आणि राज्य सरकारचं स्पष्टीकरण
राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले असल्याचं विजय वडेट्टीवार गुरुवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत सांगितलं. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. "अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील," असं त्यांनी सांगितलं. 


Maharashtra Unlock : अनलॉकबाबत गोंधळात गोंधळ! 'राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत', मंत्री वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर सरकारचं स्पष्टीकरण


श्रेयवादाचा विषय नाही, फडणवीसांच्या टीकेवर वडेट्टीवार यांचं उत्तर 
सरकारमध्येच सुरु असलेल्या गोंधळावर विरोधकांनीही तोंडसुख घेतलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत काही खोचक प्रश्न विचारले. काय सुरु, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, "विरोधक म्हणून त्यांची अशी भूमिका मांडावीच लागेल. पण यामध्ये श्रेयवादाचा विषय नाही. सरकार म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही करुच."



विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं होतं? 
विजय वडेट्टीवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, "राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी 4 जूनपासून होणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले होते. 


Maharashtra Unlock : लॉकडाऊन हटवण्यासाठी पाच टप्पे, जाणून घ्या तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?


पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ


दुसऱ्या टप्प्यातील 6 जिल्हे
अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार


तिसऱ्या टप्प्यातील 10 जिल्हे
अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर 


चौथ्या टप्प्यातील 2 जिल्हे
पुणे, रायगड


पहिल्या टप्प्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असलेल्या 18 जिल्ह्यात या गोष्टी सुरु



  • रेस्टॉरंट, मॉल्स

  • गार्डन, वॉकिंग, ट्रेक सुरू होतील

  • खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील

  • चित्रपट शूटिंगला परवानगी

  • थिएटर सुरू होतील

  • सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिली आहे

  • ई कॉमर्स सुरू राहिल

  • जिम, सलून सुरू राहणार

  • पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही

  • बस 100 टक्के क्षमतेने

  • आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल

  • इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील, त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील


लेव्हल 1 - सर्व सुरळीत राहणार


लेव्हल 2 मधील जिल्ह्यात काय?



  • 50 टक्के क्षमता रेस्टॉरंट सुरू

  • मॉल्स, थिएटर्स 50 टक्के,लोकल ट्रेन सुरु नाही

  • सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील

  • बांधकाम पूर्ण सुरू, कृषी कामे पूर्ण

  • ई सेवा पूर्ण

  • जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के सुरु

  • बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने

  • जिल्ह्याच्या बाहेर प्रायव्हेट कार, बसेस, लॉंग ट्रेन, खाजगी गाड्या,टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या लेव्हलला जाण्यासाठी ई पास लागेल


लेव्हल 3 मधील जिल्ह्यात काय?



  • अत्यावश्यक दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत 

  • इतर दुकाने  सोमवार ते शुक्रवार 7 ते 2  ( शनिवार रविवार बंद)


मुंबई लोकलचं काय?
दुसऱ्या लेव्हलमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. मुंबईत आता सध्या लोकल सुरु होणार नाही. हा रेट कमी झाला तर लोकल सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.


Maharashtra Lockdown : मोठी बातमी! पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला


राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत
परंतु यानंतर राज्य सरकारने परिपत्रक काढून निर्बंध उठवलेले नाहीत असं स्पष्ट केलं. "कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपवलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रुप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करायचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. 'ब्रेक द चेन'मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली आहे, या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरवण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरवण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असं सरकारने स्पष्ट केलं आहे. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळवला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असं माहिती व जनसंपर्क विभागाकडून आलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे.