नागपूर : महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही  तिथल्या केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचं पॅकेज दिला होता, मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असं फडणवीस म्हणाले. 


ते म्हणाले की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले. कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे, असं फडणवीस म्हणाले. 


फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केला होता तर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली होती खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले होते, असं ते म्हणाले. राज्य सरकार ने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिला, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.