Nagpur News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर चुकीच्या माणसांकडून चुकीचे आरोप करून चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आल्याचा आरोप विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


नागपूर विद्यापीठातील संघर्ष शिगेला


नागपूर विद्यापीठात परीक्षांच्या कामाकरिता नेमलेल्या एमकेसीएलवर झालेले गैरव्यवहाराचे आरोप खोटे आहेत. त्यामुळे विद्यापीठाची बदनामी करणारे भाजप आमदार प्रवीण दटके यांच्यासह एमकेसीएल वर खोटे आरोप करणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील इतर सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी खळबळजनक मागणी ही कल्पना पांडे यांनी केली आहे. भाजप नेत्या असलेल्या डॉ. पांडे यांनी आपल्याच पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांबाबत अशी मागणी केल्याने नागपूर विद्यापीठातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.


निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे निर्दोष असतानाही काही जणांनी चुकीचे आरोप करत त्यांच्या विरोधात खोट्या बोंबा ठोकून विद्यापीठाला बदनाम करण्याचे काम केले. त्यामुळे, राज्य सरकारने त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावे, अशी मागणी डॉ. पांडे यांनी केली आहे.


एमकेसीएलबाबत झालेल्या सर्व व्यवहारांच्या वेळेला व्यवस्थापन परिषदेचे तेच सदस्य कार्यरत होते. यांनी नंतर एमकेसीएल आणि त्याच्या माध्यमातून तत्कालीन कुलगुरू सुभाष चौधरी यांच्यावर आरोप केले आहेत.  


मुळात एमकेसीएलला देण्यात आलेलं काम पूर्णपणे नियमांतर्गत होतं आणि ते काम तत्कालीन कुलगुरू म्हणून डॉक्टर सुभाष चौधरी यांनी दिलेलं नाही तर तो तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने दिलं होतं.  त्यात भाजपशी संबंधित लोक ही होते याची आठवण ही कल्पना पांडे यांनी करून दिली.


भाजप आमदार प्रवीण लटके आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेतील भाजपशी संबंधित सदस्यांनी केलेल्या खोट्या आरोपामुळे विद्यापीठाची बदनामी झाली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची सुद्धा बदनामी झाली आहे. परिणामी माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी डॉ. कल्पना पांडे यांनी केली आहे.


हे ही वाचा :


Maharashtra Politics: ठाकरे विरुद्ध ठाकरे लढतीचा फायदा कोणाला? विधानसभा निवडणुकीत 'खिचडी', शिवसेनेसमोर मनसेचं आव्हान?