नागपूर : महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलं आहे. नागपूर (Nagpur) आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचं (Oranges) उत्पादन होतं. बांगलादेशमधून या संत्र्यांना मोठी मागणी असते. दर हंगामात बांगलादेशला अडीच लाख टन संत्र्याची निर्यात होते. पण आता बांगलादेशमधील अराजक स्थितीमुळे (Bangladesh Crisis) संत्र्यांची निर्यात रखडली आहे, याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे विदर्भातून (Vidarbha) बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचं यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.


एकही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही


वैदर्भीय संत्रा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी आणि निर्यातदार बांगलादेशमधील अराजक परिस्थितीमुळे सध्या चिंतेत पडले आहेत. बांगलादेशमध्ये गेले काही वर्षं सातत्याने विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत होती. गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेशमध्ये वैदर्भीय संत्र्याची मागणी काही कमी झाली नव्हती. त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता बांगलादेशमधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही.


'बाजारपेठ शोधण्यास केंद्र सरकारने मदत करावी'


स्थानिक व्यापारी देखील बांगलादेशमध्ये संत्रा निर्यातीसाठी घेऊन जाण्यास तयार नाही, त्यामुळे विदर्भात उत्पादित होणाऱ्या लाखो टन संत्र्याचा यंदा करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. अजूनही संत्र्याचा उत्पादन बाजारात येण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर महिन्यात संत्रा बाजारात येण्यास सुरुवात होईल. यंदा संत्र्याचा बहारही चांगला असल्याने दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.


संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येईल?


बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतो, असं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाटतंय. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे दोघेही संत्रा उत्पादक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील खासदार आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्रित प्रयत्न करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येऊ घातलेल्या संकटातून बाहेर काढावं, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


हेही वाचा:


Vidhan sabha election 2024: विधानसभा निवडणूक दिवाळीच्या आधी की नंतर? 'या' तारखेला निकाल लागण्याची शक्यता