Samruddhi Mahamarg Highway Accident:  समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची (Samruddhi Mahamarg Accident) संख्या देखील वाढली आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. त्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तीन महिने संशोधन केले. या संशोधन अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. 



संमोहनामुळे अपघात!


समृद्धीवरील अपघातासाठी 'महामार्ग संमोहन' जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे.  तुम्ही कधी 'महामार्ग संमोहन' हा प्रकार कधी ऐकला का? जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो.. कोणत्याच अडथळ्यांशिवाय, त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते...अशा परिस्थिती मध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला 'महामार्ग संमोहन' असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे 'महामार्ग संमोहनाचे' बळी ठरले असून अपघाताच्या काही सेंकंद आदी त्याच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. 'महामार्ग संमोहन' हे 33 टक्के अपघाताला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले. 


नियमांचे पालन न करणे


'लेन कटिंग' हे समृद्धी महामार्गावर अपघाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र  ट्रॅक आहे. त्यामुळे  समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न  नाही. मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे साईड डॅशमुळे झाले आहे. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जातांना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित मुव्हमेंट असते.  त्यातच महामार्ग संमोहनची क्रिया काम करत असल्याचे चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाची ही संधी मिळत नाही. त्यामुळे साईड डॅश होतो आणि त्यानंतर भीषण अपघात होत असल्याचे या संशोधनात पुढे आले आहे. आजवर झालेल्या अपघातात 40 टक्के या साईड डॅशमुळे झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.  


अति वेगामुळे अपघात


समृद्धी महामार्गावर 30 टक्के छोटी वाहने व 20 छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. त्यातच 51 टक्के ट्रकचालक हे लेन फालो करत नसल्याचे पुढे आले. त्यातच  समृद्धी महामार्गावर वळण मोजके असली तरी त्यांचा घेरा मोठा आहे. त्यामुळे चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. त्यामुळे चालकांकडून लेन फॉलो न झाल्याने देखील अपघात झाल्याचे संशोधनात पुढे आले आहे. याला असिव्ह ड्राईव्ह असे म्हणतात. हे 11 टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील 34 टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. सोबत काही कारणाने चालकाचे लक्ष विचलित झाल्याने 24 टक्के अपघात झाले तर मोबाईलचा वापर 8 टक्के अपघाताला कारणीभूत ठरला आहे. या सर्वांमध्ये अतिवेग हा समान धागा असल्याचे या संशोधनात दिसून आले.


अपघात कसे कमी होतील?


प्रफुल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूध बावरे या 'एमटेक'च्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरचे  अपघात कमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना सुचवल्या आहे. महामार्ग संमोहनापासून वाचण्यासाठी चालकाला मेंदू सक्रिय अवस्थेत ठेवण्यासाठी काही ठराविक अंतरावर वेगवेगळे साईनबोर्ड लावणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यामुळे ते साईनबोर्ड बघताना चालकाचा मेंदू सक्रिय राहील. सोबतच लेननुसार, स्पीड साईन बोर्ड, फीड बॅक साईन बोर्ड, स्पीड कॅमेरा, सीसीटीव्ही ज्यामुळे सतत चालक वाहन चालवतांना स्वत:ला सक्रिय ठेवेल आणि नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेईल, अशी सूचना या विद्यार्थ्यांनी केली आहे.