मुंबई : आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्यासोबतच पोलीसही कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या लढाईत अनेक कोरोना योद्ध्यांना लागण झाली. त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या अडचणी, व्यथा आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर मांडण्यात आल्या.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आणि महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समितीच्या सदस्यांशी संवाद साधला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यात चर्चा झाली. पोलीस कुटुंबातीलच हि मंडळी असल्यामुळे पोलिसांच्या अगदी नेमक्या हिताच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. त्यापैकी बऱ्याच सूचना गृहमंत्र्यांनी मान्य केल्या.


राज्याच्या थकलेल्या पोलीस खात्याला आता होमगार्डसची मदत मिळू शकेल तर येत्या काळात ज्या ट्रेन्स सुटणार आहेत त्या प्लॅटफॉर्म्सवर
कार्यरत रेल्वे पोलिसांनाही पीपीई किट्स दिल्या जातील. दर आठवड्याला पोलिसांची कोरोना टेस्ट केली जाईल, यासह अनेक सूचनांना गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली.


या सूचनांना मान्यता


1. जिल्ह्यात जर जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी म्हटले तर पोलिसांच्या मदतीला होमगार्डस देऊ, त्यांच्या पगाराची सोय करण्यात आली आहे.


2. सध्या रेल्वे स्टेशनवर काम करत असलेल्या रेल्वे पोलिसांना पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्याबाबत अंमलबजावणी करु.


3. रेड झोनमध्ये काम करणाऱ्या पोलिसांसाठी स्पेशल अॅम्बुलन्स दिली जाईल.


4. पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट दर आठवड्याला केली जाणार आहे.


5. तसेच मुंबईत वाहनांवर कारवाईची चर्चा सुरु आहे, यामध्ये सध्या लायसन्स, किल्ल्या हाताळणे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे विचार करावा ही विनंती. त्यावर सध्या इथे पोलिसांना न अडकवता फक्त कोरोनासाठीच्याच कामात वापरण्याचा निर्णय


6. व्हीआरएस घेतलेल्या पोलिसांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर विनापगारी कामावर रुजू करावे ही सूचना, आजच पाच वाजताच्या बैठकीत यासंदर्भात गृहमंत्री चर्चा करणार


7. पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. असे हल्ले करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत ही कुटुंबीयांची मागणी आहे. राज्यात 207 हल्ले झाले, ज्यात 747 लोकांवर कारवाई झाली आहे. पॉलिसी खाक्या दाखवू, कठोरात कठोर कारवाई, परत अशी हिम्मत होणार नाही याची ग्वाही गृहमंत्र्यांनी कुटुंबांना दिली.


8. 12 तास ड्युटी आणि नंतरचे 24 तास सुट्टी हे सक्तीने लागू करावेत.


9. पोलिसांच्या कुटुंबियाना त्यांच्या गावी जाण्याची मुभा द्यावी, जेणेकरुन पोलिसांच्या कुटुंबीयांना संक्रमणाचा धोका कमी होईल.


10. 55 वर्षांवरील पोलिसांना कामावर न बोलावण्याच्या आदेशाचे सक्तीने पालन करावे.