नागपूर: राजकारण अनेकदा घराणेशाहीवरून अनेक वाद होताना राजकीय वर्तुळात दिसून येतात. अशातच एका कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राजकारणातील घराणेशाही वर रोखठोक भाष्य करत जनतेने अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य एका कार्यक्रमात केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, आपण कायम आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो, वसुधैव कुटुंबकम म्हणजेच आपण म्हणतो, विश्वाचं कल्याण होवो, आपल्या संस्कृतीत असं कुठेच म्हटलं नाही, माझं कल्याण होवो, माझ्या पोरांचं कल्याण होवो, मग माझ्या दोस्तांचं कल्याण होवो, हा पण राजकारणात असं काही लोक म्हणातात. माझ्या पोराचं पहिले कल्याण करा असं काही लोक म्हणतात, असं म्हणत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी घराणेशाहीला टोला लगावला आहे.


पुढे बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले, 'माझ्या मुलांचं कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झालं तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालतं? तर लोक त्यांना मत देतात, ज्या दिवशी लोक ठरवतील. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत. त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते एका मिनीटात सरळ झाल्याशिवाय राहात नाहीत. कारण कोणाचं मुलगा, मुलगी राहणं हे, पुण्यही नाही आणि पापही नाही. त्यांनी आपली क्षमता दाखवली पाहिजे, त्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे, तुमच्या मुलाला उभं करा', असं वक्तव्य नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केलं आहे.


नेमकं काय म्हणालेत नितीन गडकरी?


एका कार्यक्रमावेळी बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले,  घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही. तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही.. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे. नागपुरातील आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात काल नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हे रोखठोक वक्तव्य केले.