Worli Accident : मुंबई : हिट अँड रन (Hit And Run Case) प्रकरणानंतर आणखी एका अपघातानं वरळी (Worli Accident) हादरली आहे. वरळीत (Worli) बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 20 जुलै रोजी वरळीत ठाण्यातील (Thane Accident) व्यावसायिकाच्या गाडीनं एका दुचाकीस्वाराला धडक दिली होती. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तरुणानं शेवटचा श्वास घेतला. अपघातावेळी व्यावसायिकाचा चालक गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. 


काही दिवसांपूर्वी झालेल्या वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर खळबळ माजली होती. अशातच आणखी एका अपघातानं वरळी हादरली आहे. वरळी सीफेस येथील एजी खान अब्दुल गफार खान रोडवर 20 जुलै रोजी बीएमब्यल्यूनं एका तरुणीला मागून येणाऱ्या मोटरगाडीनं धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार विनोद लाड (वय 28) गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोदवर नायर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान शनिवारी विनोदचा मृत्यू झाला. 


मूळचा मालवण येथील रहिवासी असलेला विनोद ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर कामाला होता. मोटरसायकलवरून खाली पडून विनोदच्या डोक्याला मार लागला होता. आठ दिवस विनोद मृत्यूशी झुंज देत होता. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. मोटरगाडी ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दरम्यान, वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी तो ठाण्याहून वरळीमध्ये आला होता. दरम्यान, अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असं तक्रारीत म्हटलं आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


काही दिवसांपूर्वी वरळीत घडलेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला होता. आधी पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण आणि त्यानंतर वरळीतील हिट अँड रन, दोन्ही प्रकरणांमध्ये बड्या बापाच्या लेकांचे कारनामे समोर आले होते. वरळीतील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर, पुण्यातील अपघातात दोन इंजिनिअर्सचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. दोन्ही प्रकरण हायप्रोफाईल होती. दोन्ही प्रकरणांमध्ये जसजशी चौकशी होत गेली, तसतसे अनेक खळबळजनक खुलासे होत गेले. अशातच आणखी एका अपघातानं वरळी हादरली होती. आता सातत्यानं एकापाठोपाठ एक होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.