मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Mumbai Metro Slab Collapse: मुलुंड पश्चिमेकडील जॉन्सन अँड जॉन्सन अँड ओबेरॉय परिसरातील एलबीएस मार्गावर मुंबई मेट्रो लाईन 4 मधील एक मोठा काँक्रीट स्लॅब धावत्या वाहनांवर कोसळला.

Mumbai Metro Slab Collapse: मुंबईत मरण अगदी स्वस्त झालंय हे अधोरेखित करणारी आणखी एक भीषण घटना घडली. मुलुंड पश्चिमेकडील जॉन्सन अँड जॉन्सन अँड ओबेरॉय परिसरातील एलबीएस मार्गावर मुंबई मेट्रो लाईन 4 मधील एक मोठा काँक्रीट स्लॅब धावत्या वाहनांवर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ही घटना आज (14 फेब्रुवारी) दुपारी 12:20 वाजता घडली. स्लॅब थेट कार आणि खाली जाणाऱ्या ऑटोरिक्षावर कोसळला. ढिगाऱ्याखाली एक ऑटोचालक आणि एक महिला अडली. अपघातस्थळावरील व्हिडिओंमध्ये चिरडलेल्या कार आणि ऑटोचे भयानक दृश्ये होती. रक्ताळलेल्या अवस्थेतील रिक्षाचालकाला स्लॅबखालून बाहेर काढण्यात आले. या भीषण घटनेत रामधन यादव यांना मृत घोषित करण्यात आले. इतर जखमींमध्ये राजकुमार यादव (45) आणि महेंद्र प्रताप यादव (52) आणि दीपा रुहिया (40) अशी ओळख पटली आहे. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले, तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.
जबाबदारी घेतील की प्रकरण दाबतील?
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मुलूंडमधील LBS रोड वर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याचे वृत्त आहे. प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाला असून ३-४ जण जखमी आहेत. ‘सो कॉल्ड Infra Man’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? की यातील भ्रष्टाचारात त्यांचीही भागीदारी असल्याने मलमपट्टी करण्यासाठी पुन्हा काहीतरी दुसरे मुद्दे काढून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतील?
सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही?
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, एमएमआरडीए जबाबदारी घेणार का? हे कोणते कंत्राटदार आहे? त्यांच्यावर कारवाई होणार का? मेट्रोची काम लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? यात सामन्यांचा जीव जातोय...मेट्रोची काम किती वेगाने सुरू आहे दाखवण्याचा नादात त्याचा दर्जा आणि सुरक्षा प्रशासन बघणार आहे की नाही? मुंबईकर एकतर खड्ड्यात नाहीतर मेट्रो बांधकामादरम्यान होणाऱ्या जिवघेण्या अपघातात भरडला जात आहे!
कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज बांधकामाधीन मेट्रो 4 मार्गाचा एक मोठा तुकडा एका रिक्षा आणि एका कारवर पडला. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी एक भिंत कोसळली होती आणि तत्कालीन नव्याने उद्घाटन झालेल्या मेट्रो मार्ग 3 मध्ये पावसाचे पाणी भरले होते. सरकार या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकेल का? कदाचित नाही, कदाचित काही लाखांचा दंड दाखवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देईल.
भाजप राजवटीत मानवी जीवनाची किंमत नाही
ते पुढे म्हणाले की, लक्षात घेतले तर, काम पूर्ण होण्यापूर्वीच खांब रंगवलेले आहेत. यासाठी राज्याला काही कोटींचा खर्च येईल आणि नंतर काम पूर्ण झाल्यावर, ते पुन्हा करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील. आजही, बहुतेक पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये भयानक बॅरिकेडिंग आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी होते किंवा वाहने उघड्या खड्ड्यात पडतात. भाजप राजवटीत जीवनाची किंमत नाही. मेट्रो मार्गावरून पडणारे तुकडे, वाहतुकीचे असुरक्षित मार्ग, तासनतास मदतीशिवाय कार/बाईक उघड्या खड्ड्यात पडणे. किती लाजिरवाणी गोष्ट आहे! लवकरच असा दिवस येईल जेव्हा देश आपल्या देशातही अशा गोष्टींसाठी प्रवासाचे इशारे देतील.
इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण
वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, आज दुपारी मुलुंड पश्चिम, एलबीएस रोडवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या निर्माणाधीन पिलरचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात एक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सरकार आणि एमएमआरडीए प्रशासनाला काही देणंघेणं आहे की नाही? फक्त इन्फ्रा मॅन म्हणून PR करायचे, मार्केटिंग करायचं पण मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे, त्याच काय?
विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, मेट्रोचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम फक्त कागदावरच का? वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू असताना खालून जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मेट्रोची कामं वेगाने होत आहेत, हे दाखवण्याच्या नादात त्याचा दर्जा आणि तांत्रिक सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का? जबाबदारी कोणाची? दरवेळी अशा घटना घडल्यानंतर फक्त 'चौकशी'चं नाटक होतं. याची जबाबदारी कोण घेणार? विकास हवाय, पण तो मुंबईकरांच्या जीवावर बेतणारा नको!
मृताच्या वारसांना 5 लाखांची मदत
दरम्यान, या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देईल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना फडणवीस यांनी केली आहे.
एमएमआरडीएने केला खुलासा
दरम्यान, एक्स वर पोस्ट केलेल्या निवेदनात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांगितले की, ही घटना दुपारी 12.15 वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव (मिलान) स्ट्रीटमधील मेट्रो लाईन बांधकामाच्या पियर पी196 जवळ घडली, जिथे पॅरापेट सेगमेंटचा एक भाग उंचीवरून पडला आणि जाणाऱ्या ऑटोरिक्षाला धडकला. एमएमआरडीएने सांगितलं की,दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत आणि त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, जिथे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. मेट्रो प्रकल्प पथक घटनास्थळी आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधून मदत कार्य करत आहे आणि परिसर सुरक्षित करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























