मुंबई:  नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट आहे. काहींचा या प्रकल्पाला विरोध होत आहे, मात्र हा विरोध चर्चेने सोडवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.


“मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मला वाटते नाणार रिफाईनरी होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण तो विरोध चर्चा करून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून विषय संपवावे ही आमची भूमिका आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

धर्मेंद्र प्रधान

यावेळी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेचं नाव न घेतां सूचक वक्तव्य केलं.

मान सन्मान मुद्दा नाही, प्रतिष्ठेचा मुद्दा नाही, शेतकरी वर्गातून मी आलो आहे. जमीन अधिग्रहित करण्याचं दुःख मलाही माहिती आहे. मी खुल्या मनाने चर्चा करू पाहतोय, त्यावर मी सविस्तर ही बोलणार आहे, असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांना भेट नाकारली होती.

नाणारच्या प्रकल्पाचा शिवसेनेचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सांगितलं होतं. मात्र आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली.

नाणार प्रकल्प

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.

काय आहे नाणार प्रकल्प?
खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे

जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय

ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.

प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल

या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार

रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.

नाणार प्रकल्पाला विरोध का?

रिफायनरी म्हणजे प्रदूषण हे साधं सरळ समीकरण जगभर आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले अनेक शेतकरी एका दिवसात भूमीहीन होणार आहेत. शेतकऱ्याचा तोंडचा घास तोंडातच अडकला आहे.

या प्रकल्पग्रस्त भागात जवळपास 12 लाख आंब्याची झाडं आहेत. तितकीच काजू आणि नारळाची झाडंही आहेत. त्याशिवाय काही हजार एकर भागात भातशेती होते.  याशिवाय नाचणी, वरी, कुळीथ, भाजीपाला याचंही उत्पन्न इथला शेतकरी दरवर्षी घेतो. इथल्या समृद्ध जंगलात वावडिंग, हरडा, चारोळे यांसारख्या अनेक औषधी वनस्पती सापडतात, त्यावर इथल्या भटक्या आणि आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालतो.

माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य
जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प

जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना

वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता

पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे?
इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांना भेट नाकारली   

नाणार प्रकल्पाच्या करारावर दिल्लीत स्वाक्षरी 

कोकणात ‘नाणार’ काही होत नाही, आम्ही तो घालवलाय : उद्धव ठाकरे