मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी मुलं वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मधल्या सुटीव्यतिरीक्त शाळेच्या अभ्यासाच्या वेळेत आणखी एक सुट्टी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ती सुट्टी असेल पाणी पिण्यासाठी. विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी दर तासाने एक बेल वाजवली जाणार आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. मुले पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी मुंबईतील शाळांमध्ये मधल्या सुट्टीसोबतच वॉटर बेल असावी, अशी सूचना शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका सभागृहापुढे मांडली आहे. मुंबईतील खासगी व पालिका शाळांमध्येही एका सत्रात तीनवेळा घंटा वाजवून पाणी पिण्याची मुलांना आठवण करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. याबाबतची ठरावाची सूचना त्यांनी पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडली आहे. या ठरावाला अद्याप सभागृहाची मंजूरी मिळालेली नाही. सभागृहाच्या मंजूरीनंतर, पालिका आयुक्तांच्या आदेशानं याची अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. वॉटर बेलमुळे काय होणार? अन्न पचविणे, रक्ताभिसरण सुलभ करणे, पोषण मूल्ये सर्व अवयवांपर्यंत पोहोचवणे, शरीराचे तापमान समतोल राखणे, आदी महत्त्वपूर्ण कार्य शरीरातील पाणी करते. त्यामुळे दिवसभरात ठराविक वेळेच्या अंतराने आवश्यक प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, शाळेत जाणाऱ्या मुलांचे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होते. मुलांचा दिवसातील पाच ते सात तासांचा कालावधी शाळेत जातो. अभ्यास, खेळ यामुळे अनेक विद्यार्थी पाणीच पित नाहीत. या कालावधीत किमान तीनवेळा पाणी पिणे आवश्यक आहे. यापर्वी वॉटर बेल संकल्पना कुठे राबवली गेली - मुले शाळेत आल्यानंतर अभ्यासाच्या नादात पाणी पिण्यास विसरतात. घरुन आणलेली पाण्याची बॉटल तशीच भरलेली असते. शाळेत पाणी न पिण्यामुळे मुलांना किडनी स्टोन, मूत्रसंसर्ग, डोकेदुखी, डिहायड्रेशन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. याची जाणीव झाल्यामुळे केरळमधील इंद्रप्रस्थ विद्यालयाने मुलांना पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी पहिल्यांदा वॉटर बेलची सुरुवात केली. त्यानंतर केरळ राज्यात सर्वच शाळांमध्ये अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारनं घेतला आहे. त्याधर्तीवर अकोल्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत ही संकल्पना राबवली गेली. हेही वाचा - ..तर, 'पाणी' पेट्रोल-डिझेल सारखं विकत घ्यावं लागेल!मुंबईत नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारकWEB EXCLUSIVE | घरोघरच्या पाणी शुद्धीकरण मशीन किती चांगल्या? | ABP MAJHA