नवी मुंबई : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. 2019 डिसेंबरपर्यंत कशाहीप्रकारे हे काम सुरु करण्यासाठी इथे राहत असलेल्या प्रकल्पग्रस्तांवर मात्र सिडको अन्याय करताना दिसत आहे. योग्य पुनर्वसन न करताच गावं तोडली जात आहेत. अनेक पिढ्या ज्या घरात जन्मल्या, ज्या गावात वाढल्या, हे सर्व जमीनदोस्त होताना पाहून तणावाखाली येत, 50 हून अधिक वयोवृद्धांनी आपले प्राण सोडले आहेत.


सिडको या सरकारी यंत्रणेकडून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. 2250 हेक्टर क्षेत्रावर हे विमानतळ उभं राहणार असून यासाठी 24 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळाच्या हद्दीत येणाऱ्या 18 गावांच्या जमिनी सिडकोने हस्तांतर केल्या आहेत. यामधील दहा गावातील लोकांना जमिनीसोबतच आपलं पिढ्यान पिढ्या राहतं घर सोडून जावं लागलं आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजमध्ये दिलेल्या सर्व बाबी पूर्ण न करताच गावकऱ्यांना जबरदस्तीने गाव सोडण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचा आरोप होत आहे.

सिडकोने आठ गावातील घरं तोडल्याने गावांना भयानतेचे स्वरुप आलं आहे. ज्या घरात अनेक पिढ्या गेल्या ते सोडून जाण्यास अनेक बुजूर्ग मंडळींनी नकार दिला. त्यांचं मन हे गाव सोडण्यास तयार नव्हतं. पण घरं तुटल्याने इतर भागात गावकऱ्यांना स्थलांतरित व्हावं लागलं. दुसऱ्या भागात राहायला जाऊनही गावात येऊन आपल्या तुटलेल्या घरात बसून अनेक जण अश्रू ढाळतात. घर तुटल्याने, गाव सोडावं लागल्याने धसका घेत जवळपास 50 गावकऱ्यांनी आपले प्राण सोडले आहेत. विशेषत: वयस्कर मंडळींनी हृदयविकाराचा झटका येऊन, आजारी पडून, आठवणी काढून प्राण सोडले आहे. चिंचपाडा या एका गावात गेल्या दोन महिन्यात 20 ते 20 जणांचा मृत्यू झाले आहेत. आठ गावातील मिळून हा आकडा 50 वर गेल्याचं गावकरी सांगतात.

सिडकोने गावातील लोकांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यापूर्वी मुलभूत सुविधा असलेल्या स्मशानभूमी, समाजमंदिर, शाळा, दवाखाना आदींची सोय करण्याचा शब्द दिला होता. मात्र यातील कोणतीच गोष्टी सिडकोने पाळला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.