डोंबिवली : शिवसेना-भाजपने एकत्र यावं, यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मात्र युती झाली नाही, तर शिवसेनेचंच जास्त नुकसान होईल, असं भाकित रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. शिवसेनेच्या कोट्यातील जागेवरही रामदास आठवलेंचा डोळा आहे.


मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली आहे, तर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले म्हणाले. मला पुन्हा एकदा लोकसभेवर जाण्याची इच्छा असून त्यासाठी शिवसेनेच्या कोट्यातली दक्षिण मध्य मुंबईची जागा देण्याची मागणीही आठवलेंनी केली.

वंचित आघाडीवर रामदास आठवलेंनी जोरदार टीका केली. वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. वंचित जर सत्तेसाठी एकत्र आले असतील, तर त्यांनी माझ्यासोबत यावं, कारण प्रकाश आंबेडकरांसोबत जाऊन त्यांना सत्ता मिळणार नाही, असा टोला आठवलेंनी लगावला. तसंच वंचित आघाडीच्या मतांचा फायदा महायुतीलाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेवरही आठवलेंनी भाष्य केलं. पवार साहेब लोकसभेत येणार असतील तर आनंदच आहे. मी लोकसभेत जाणार, मग पवार साहेब एकटे राज्यसभेत कसे राहतील? असा मिश्किल सवाल त्यांनी केला.

मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चालल्याबाबत आठवलेंनी चिंता व्यक्त केली. मराठी माणसाने उद्योग, व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. आपण कामं करत नाही, त्यामुळे उत्तर भारतीय येऊन ती कामं करतात, असं म्हणत आठवलेंनी मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळण्याचं आवाहन केलं.