Vasai News : प्रेमभंग झाला म्हणून एका तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या तरुणाला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. तरुण आत्महत्या करण्यासाठी एका टेकडीवर गेला होता. पोलिसांनी या तरुणाला फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवलं आणि तब्बल 200 पायऱ्या चढत जाऊन या तरुणाचे प्राण वाचवले. 


प्रेमभंगात आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वाचवलं आहे. मुंबईत राहणारा 27 वर्षीय सद्दाम कुरेशी या तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत त्याचं लग्नही ठरलं होतं. परंतु त्या मुलीनं याला काहीएक न सांगता, दुसऱ्या मुलासोबत लग्न केलं आणि त्यामुळे हा तरुण निराश झाला. शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी वसई पूर्वेच्या नवजीवन झोपडपट्टी येथील गावदेवी मंदिर टेकडीवर तो गेला होता. ही माहिती मीरा-भाईंदर वसई-विरार अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच त्यांनी सकाळी सव्वा अकरा वाजता वालीव पोलिसांना ही माहिती दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली.


हा तरुण ज्या टेकडीवर होता. ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. जवळपास 200 पायऱ्या चढायच्या होत्या. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं. पोलिसांना पोहोचायला 5 मिनिटं जरी उशीर झाला असता तरी त्यानं खाली उडी मारून जीव दिला असता. या वेळी त्याच्याशी बोलत राहणं, धीर देणं गरजेचं होतं आम्ही त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक बळीद यांनी दिली. पोलिसांनी या तरुणाचं समुपोदेशन करुन, त्याचे वडील सलीम कुरेशी यांच्या ताब्यात दिलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :