रायगड : उरणमध्ये दहशतवादी दिसल्याचा दावा अखेर अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. उरणमधील काही शालेय विद्यार्थ्यांनी पठाणी कपड्यात काही सशस्त्र अतिरेकी दिसल्याची तक्रार केली होती.

उरण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्रात घबराट पसरली होती. वेस्टर्न नेव्हल कमांडकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडच्या किनारी भागात अतिदक्षतेचा इशारा जारी केला होता. एनएसजीचे जवान आणि राज्य पोलिस दलाच्या तुकड्यांनी जंग जंग पछाडूनही कोणाचा ठावठिकाणा लागला नाही.

उरीमधील दहशतवादी हल्ला ताजा असतानाच 26/11 प्रमाणेच सशस्त्र हल्ला होण्याची भीती वर्तवण्यात आली होती. मात्र हा दावा अफवा ठरल्यामुळे मौल्यवान वेळ आणि संसाधनांचा अपव्यय असल्याचं समोर आलं आहे.

12 वर्षीय विद्यार्थिनीने संशयित दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. चौकशीच्या दुसऱ्या फेरीत मात्र तिने घूमजाव केलं. काळे कपडे घातलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांचे फोटो आपण पाहिले होते. त्यामुळे आपण बनाव आखल्याचं तिने म्हटलं आहे.

दरम्यान, खोटी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. कारवाईच्या भीतीने नागरिकांनी यापुढे खरे दहशतवादी दिसूनही माहिती न दिल्यास महागात पडू शकेल, हे टाळण्यासाठी आम्ही मुलांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.