मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंंना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे.


मला वाटत नाही ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल. त्यामुळे दोन दिवस थांबुया, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात कट्टर विरोधक असले तरी त्यांनी आपलं नातं जपल्याचे अनेक प्रसंगातून समोर आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं होत.


याशिवाय कोहिनूर प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचंही ही नाव समोर आलं आहे. त्यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रकरणात आपल्या माणसांच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.


राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष

काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.



संबंधित बातम्या