ठाणे : ठाण्यातील कळवा, विटावा भागात राहणाऱ्या मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ईडीच्या नोटीसनंतर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.


मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ठाण्याच्या विटावा भागात राहणाऱ्या 26 वर्षीय प्रवीण चौघुले या तरुणाने आत्महत्या केली. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी ऐकूण गेल्या दोन दिवसांपासून तो अस्वस्थ होता. मागील दोन दिवसात फेसबुकवर त्याने राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. या चिंतेतूनच काल अचानक त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


प्रवीण चौघुलेला जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रवीण विटावा भागात एकटा राहत होता. मनसे पक्षाचं तो काम करायचा. राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीची नोटीसची बातमी आल्यानंतर त्याने स्वतः ला पेटवून घेतल्याचं त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं. मात्र याबाबत पोलीस अधिक तपास करत असून प्रवीणच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.



राज ठाकरे ईडीची नोटीस


राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.


VIDEO | 'लाव रे तो व्हीडिओ'मुळे राज ठाकरेंना नोटीस? | माझा विशेष

काय आहे प्रकरण?


काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.



संबंधित बातम्या