'जय श्रीराम' लिहिलेली 10 लाख पत्र शरद पवारांना पाठवणार, भाजपा युवा मोर्चाकडून राज्यभर अभियान

राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असं वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे फारच खेदजनक आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध केला आहे.

Continues below advertisement

विनायक पाटील/निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा : आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असताना या विषयात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड 'जय श्रीराम' लिहून पाठवली जाणार आहेत. भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या अभियानाची घोषणा करत पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधून पोस्टकार्ड शरद पवार यांना धाडण्यात आली.

Continues below advertisement

राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असं वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे फारच खेदजनक आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध केला आहे. समस्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या भावना यानिमित्ताने तीव्र आहेत आणि म्हणूनच याविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'जय श्रीराम' लिहिलेली पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवावीत, असे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून तब्बल 10 लाख पत्र शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. याची सुरुवात पनवेल येथील पोस्ट कार्यालयात जाऊन करण्यात आली.

काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला

रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कुणी बोलणार असेल तर प्रभू रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. कोरोना महामारी विषयांमध्ये केंद्रातील सरकार उचित कार्यवाही करत आहे व संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे. इतर सर्व राज्यही चांगले काम करत आहेत. परंतु या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कुठेही सुसूत्रता दिसत नाही. महाराष्ट्र आज कोरोनामध्ये नंबर वन झालेला आहे. आघाडी सरकारमधील तीनही पक्षात बिलकुल समन्वय दिसत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे, त्यामुळे राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही. तर मग ज्यामुळे करोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारला शिकवाव्यात म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल, असं आवाहन भाजपा युवा मोर्चा कडून करण्यात आले आहे.

लातूरमधील मुख्य पोस्ट ऑफिसबाहेर कार्यकर्ते जमा झाली होती. पत्रावर जय श्रीराम नाव असल्याचा मायन्यासह ही पत्रे पाठविण्यात येत आहेत. शरद पवार यांना आम्ही जाणीव करून द्यावी यासाठी हा पत्र प्रपंच आहे. राम जन्मभूमी हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. आमची ती आस्था आहे. भारतीय मानसिकतेचा तो भक्कम आधार आहे. हे सर्व माहित असताना फक्त राजकीय हेतु नजरेसमोर ठेवून अशी वक्तव्य आपण कशी करु शकता? असा सवाल भाजपा युवा मोर्च्याच्या प्रेरणा होणाराव यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांनी राजकारण विरहित होत याकडे पाहावे यासाठी आम्ही हा पत्र प्रपंच केला आहे. त्यांना लोकभावना लक्षात यावी हा या मागील उद्देश आहे, असं प्रेरणा होणाराव यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते शरद पवार?
कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत, ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं होते. कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटाता सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं.
संबंधित बातम्या Sharad Pawar on Ram Mandir | काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांचा पंतप्रधानांना टोला
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola