मुंबई : राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवारपासून (15 जून) राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. तर प्रभावित क्षेत्रात ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली. शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे.


शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. त्यानुसार राज्यात उद्या म्हणजून सोमवारपासून (15 जून) शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.


कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात प्रत्यक्ष शाळा उघडणार! मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास संमती


शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली




  • ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर मोठी जबाबदारी.

  • आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल.

  • गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल.

  • शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील.

  • गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल.

  • बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे.

  • सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे.

  • ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणेकरून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल.

  • गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे.

  • ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल अॅपचा उपयोग.

  • शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे.


शाळा सुरू करण्याचे नियोजन

  • रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10 आणि 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून,

  • 6 वी ते 8 वी ऑगस्टपासून.

  • वर्ग तिसरी ते पाचवीपर्यंत सप्टेंबरपासून.

  • वर्ग पहिला ते 2 रीपर्यंत शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने निर्णय घेण्याची मुभा

  • इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.

  • ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले.


Unlock 1.0 | शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता