Sanjay Raut on Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत व्यस्त असतानाही राहुल गांधींकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. आम्हाला तुमची चिंता होती, असं राहुल गांधींनी म्हटल्याचा उल्लेखही ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. तसेच, राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्याबाबत एखाद्याला दु:ख वाटणं हीच माणुसकी असल्याचंही संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, संजय राऊत दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. 


खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलंय की, "भारत जोडोत व्यस्त असुनही  राहुल  यांनी  रात्री  फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे  म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय.."






संजय राऊत यांनी यासंदर्भात माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "राहुल गांधींसोबत माझं काल माझं बोलण झालं. त्यांनी माझी चौकशी केली. मी कारागृहात असताना किती लोकं माझ्या घरी आले, कुटुंबीयांसोबत उभे राहिले? आज राज्यातल्या प्रत्येक पक्षात आमचे जुने सहकारी आहेत, पण किती लोक आले? आमचे जरी राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटंबियांनी ठाकरे आणि पवारांप्रामणे माझी चौकशी केली. आज ते देशभरात राहुल म्हणून फिरतायत, त्यांच्यात साहेबपणा नाही." 


राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास, फडणवीसांचा बचाव केविलवाणा : संजय राऊत 


राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, हा देवेंद्र फडणवीसांचा बचाव केविलवाणा आहे. मग आम्हीही राहुल गांधींच्या बाबतीत हे बोलू शकतो. पण आम्ही तसं केलं नाही, जे चूक आहे, ते चूकच म्हटलं पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल इतर कुणी काही बोललं असतं तर तुम्ही थयथयाट केला असतात. तुमचे राज्यपाल आहेत, म्हणून तुम्ही गप्प बसलात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफी मागायला लावल्याशिवाय राहणार नाही."