Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक यांना धमकावलं होतं, असा आरोप आता संजय राऊतांनी केला आहे. ते पुढं पळतील आणि जनता त्यांच्या मागे लागेल त्यांची धिंड जनता काढेल, असा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्यांना स्वप्नातही बंगलेच दिसतात, त्यांचे स्वत:चेच बेनामी बंगले असतील, असं ते म्हणाले. त्या जागेवर एकही बंगला नाही. हा भुताटकीचा प्रकार आहे, भाजपला भुतानं झपाटलं आहे, असंही ते म्हणाले. 


एका मराठी माणसानं भाजपच्या दबावामुळं आत्महत्या केली


संजय राऊतांनी म्हटलं आहे की, अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर या लोकांनी बोलायला हवं. नाईकांना ज्यांच्यामुळं आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ हे लोक उतरले होते. एका मराठी माणसानं भाजपच्या दबावामुळं आत्महत्या केली. कारण अर्णब गोस्वामीला हे लोकं वाचवत होते, या किरीट सोमय्यांनी देखील नाईक यांना धमक्या दिल्या आहेत. अर्णबला बिल पाठवायचं नाही, त्यांना पैसे मागायची नाही अशा प्रकारे त्यांना बोलावून सोमय्यांनी धमक्या दिल्या. यानंतरच अन्वय नाईकांनी आत्महत्या  केली, असा आरोप राऊत यांनी केला आहे. 


हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत


भाजपचे हे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहेत, असं राऊत यांनी एकेरी भाषेत म्हटलं आहे. आता त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. आता पाहत राहा, त्यांचा खेळ खल्लास झालाय. ते जे पळत आहेत ते जेलच्या दिशेने पळत आहेत, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार आहेत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


इतर संबंधित बातम्या


महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल


Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...