मुंबई : आज नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात तब्बल 10 हजार आंदोलक सहभागी झाले होते. यासाठी 2 हजार पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. दिवसभर हे आंदोलन अगदी शांततेत पार पडलं. हे आंदोलन पोलिस आणि आयोजक यांच्यातील सौहार्दपुर्ण संवादामुळे विशेष लक्षणीय ठरलं. याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा..


मुंबईतील हजारो आंदोलकांचा शिस्तपूर्ण मोर्चा पाहिल्यानंतर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल, की हे कसं शक्य झालं? संपूर्ण आंदोलनात कोणतीही अनुचित घटना नाही, की कोठेही वादविवाद नाही, हे नेमकं कशामुळ घडलं? मुळात हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात आयोजीत करण्याचा मानस आयोजकांचा होता. परंतु, या परिसरात असणाऱ्या सरकारी कार्यालयामुळे पोलीस प्रशासनाने हा मोर्चा ऑगस्ट क्रांती मैदानात घेण्याची विनंती आयोजकांना केली. त्यांनी देखील ती तत्काळ मान्य केली.

आयोजकांनी पोलीसांची विनंती मान्य केल्यानंतर आता खरं आव्हान पोलीस प्रशासनासमोर होतं. देशभरात अनेक ठिकाणी होतं असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे मुंबईतील मोर्चा शांतते कसा पार पाडायचा यासाठी पोलिसांनी एक विशेष प्लान तयार केला.

  • आंदोलनासाठी पोलीसांची 2 हजार जवानांची फौज तयार करण्यात आली.
    अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांची सीसीटीव्हीची गाडी मोर्चावर सतत लक्ष ठेऊन होती.
    आंदोलनाच्या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांचे आवाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
    आंदोलनस्थळापासून जाणाऱ्या रस्त्यांचे मार्ग बदलण्यात आले.
    आंदोलनात समाजकंटक घुसण्याची शक्यता असल्यामुळे साध्या वेशातील पोलिसांनी त्यांची आधीच धरपकड केली होती.
    प्रत्येक संघटनेच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं होतं.


या प्लानसोबतच पोलीसांनी आंदोलकांकडुन कोणतीही हिंसक घटना घडणार नाही. हे लिखित स्वरुपात देखील घेतलं होतं. त्यामुळेच देशभरात या आंदोलनाला अनेक ठिकाणी गालबोट लागत असताना मुंबईत मात्र हे आंदोलन दुपारी 4 वाजता सुरु होऊन राष्ट्रगीत झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता संपुष्टात आलं.

संबंधित बातम्या:

CAA आणि NRC बद्दल तुमच्याही मनात आहेत 'हे' प्रश्न, जाणून घ्या नेमकी उत्तरं

CAA Protest | देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नागरिक रस्त्यावर; अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण

CAA Protest | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मुस्लीमांचा मोर्चा, मालेगाव बंदची हाक | ABP Majha