मुंबई : राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरु (Schools Reopening) करण्यास परवानगी मागितली होती. त्यामुळे पुढील महिन्यात शाळेची घंटा वाजणार आहे. त्यानुसार आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. शाळा सुरु करण्याअगोदर शिक्षक आणि पालकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.


शिक्षण मंत्री गायकवाड काय म्हणाल्या?
आधी कोरोनामुक्त झालेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टास्क फोर्ससोबत चर्चेनंतर आता ग्रामीण भागात पाचवी ते 12 आणि शहरी भागात आठवी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले आहे. शाळा सुरु करण्याअगोदर आजारी मुलांना कसं शोधायचं? त्याच्या संदर्भात टास्क फोर्स ट्रेनिंग देणार आहे. यासोबतच पालकांनी काय काळजी घ्यायची या संदर्भातही आम्ही माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार


राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत याआधी शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता.


गणेशोत्सवात कोरोनाचे आकडे फारसे वाढलेले दिसत नाहीये. शिवाय आणखी गणेशोत्सवनंतरचे 10 ते 12 दिवस कोरोना स्थितीचा आढावा घेऊन सोबतच दिवाळी सारख्या मोठ्या सणाच्या दरम्यान कोरोना परिस्थिती पाहून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे चाइल्ड टास्क फोर्स सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले होते. त्यानंतर आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यास खुद्द मुख्यमंत्र्यांनीच परवानगी दिली आहे.


पूर्वतयारी करावी लागणार..
शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत त्याबाबतची तयारी शिक्षण विभागला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला या दरम्यान पूर्ण करायची आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभाग सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा नियोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.