Rajya Sabha Election 2022 : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आज पुन्हा एकदा चर्चेत आले ते वादग्रस्त वक्तव्याने नव्हे तर....त्यांनी घेतलेल्या एका वेगळ्या निर्णयाने. आमदार संजय गायकवाड यांचा जीवनपट म्हणजे रस्त्यावरचा एक आक्रमक कार्यकर्ता...आमदार होण्यापूर्वी ते एक सामान्य शिवसैनिक होते, मात्र आमदार झाल्यावरही ते सामान्यच आहेत याचा प्रत्यय त्यांनी एक निर्णय घेऊन दिला आहे. केवळ प्रत्ययच नाही तर राज्यातील इतर आमदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं आहे.


आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं
दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने आपापल्या आमदारांना मुंबईतील फाईव्ह स्टार, सेव्हन स्टार डिलक्स हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यात आमदार संजय गायकवाड देखील होते. त्या ठिकाणचा अफाट खर्च पाहून संजय गायकवाड यांच्यातील जुना सामान्य कार्यकर्ता जागा झाला आणि त्यांना आपले जुने दिवस आठवले. 


शिवसेना आमदारांचा मुक्काम ट्रायडंट हॉटेलमध्ये, एका रुमचं एका दिवसाचं भाडं 16 हजार रुपये
शिवसेनेचे आमदार मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेने या हॉटेलमध्ये 70 रुम बुक केल्या आहेत. ज्यात पक्षाच्या आमदारांसह अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. आमदारांना या हॉटेलमध्ये ठेवण्याचा खर्चही तेवढाच जास्त आहे. ट्रायडंट हॉटेलमध्ये एका रुमचं एका दिवसाचं भाडं सुमारे 16 हजार रुपये आहे. म्हणजेच एक दिवसाचा खर्च 11 लाख 20 हजार रुपये आहे. पक्षाने चार दिवसांसाठी या हॉटेलमध्ये रुम बुक केल्या आहेत. म्हणजेच चार दिवसाचा खर्च जवळपास 44 लाख 80 हजार रुपये एवढा आहे.


...आणि संजय गायकवाड यांनी फाईव्ह स्टार हॉटेल सोडून आमदार निवास गाठलं 
फाईव्ह स्टार संस्कृती त्यांना पचनी पडली नाही. ते अस्वस्थ झाले होते. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण या ठिकाणी राहू शकत नाही असं त्यांना कळवलं. त्यानंतर तात्काळ फाईव्ह स्टार हॉटेल सोडून आपलं आमदार निवासातील घर गाठलं. यामुळे मात्र वेगळे संकेत गेले. फोडाफोडीच्या चर्चा देखील रंगल्या. मात्र संजय गायकवाड यांची भूमिका शरद पवार यांना देखील आवडल्याचं बोललं जातं आहे. यामुळे मात्र सामान्य कार्यकर्त्यांना एक वेगळा आणि सकारात्मक संदेश गेल्याची चर्चा होत आहे.


राज्यसभेसाठी आज मतदान; संध्याकाळी 7 वाजता निकाल
राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील सहा जागांसाठी मतदान पार पडले. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. 


सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात 
विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.


राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला म्हणजेच, आज होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. 


संबंधित बातम्या