मुंबई : डिसेंबर महिन्याला सुरुवात झालीय तरी देखील राज्यात थंडीचा लवलेशही नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यानं ढगाळ हवामानामुळे तापमानात वाढ झालीय. मुंबईमध्ये पहाटे पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या आहेत. दरम्यान, अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळं घोंगावण्याची दाट शक्यता आहे. पवन आणि अंफन अशी या चक्रीवादळांची नावं आहेत.
येत्या 24 तासांत ही चक्रीवादळं निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांना यासंदर्भात सतर्क करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक भागात बुधवार, गुरुवार दरम्यान पावसाचा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे. पवन हे नाव श्रीलंकेच्या सूचनेवरुन देण्यात आले आहे. तर अंफन हे नाव थायलंडच्या सूचनेनुसार देण्यात आले आहे.


क्यार आणि महा चक्रीवादळा सारखीच परिस्थिती -
क्यार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. अरबी समुद्रात याआधी चार तर बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळांची या वर्षी निर्मिती झाली. त्यात आणखी दोन वादळांची भर पडल्यास वादळांची संख्या 9 वर पोहचणार आहे. 1976 मध्ये भारताला सर्वाधिक 10 वादळांचा तडाखा बसला होता.

राज्यातून थंडी गायब -
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यभर बघायला मिळतोय. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह प्रमुख शहरातून थंडी पूर्णपणे गायब झालीय. ढगाळ हवामानमुळे तापमानात वाढ झालीय. 24 तासांत नाशिकमध्ये दोन अंशाने किमान तपमानात वाढ झाली असून पारा 20 अंशावर जाऊन पोहचला आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत सहा अंशाने पारा जास्त आहे. त्यामुळे नाशिककर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कडाक्याच्या थंडीला मिस करत आहेत.

विदर्भातही तापमान कमी होईना
नागपूरची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. गेल्या काही दिवसांपासुन नागपूरचे किमान तापमान 15/16 अंशावर गेलंय. ढगाळ हवामानाचा परिणाम नागपूरमध्येही जाणवू लागला आहे. इथल्या तापमानात अडीच तीन अंशाने वाढ झालीय. सहा तारखेपर्यंत असं ढगाळ हवामान राहील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात येतंय. उत्तरेकडून येणारे वारे अजून आपल्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. हवेत बाष्प प्रमाण जास्त आहे. त्यामुळे थंडी जाणवत नाहीये. म्हणूनच कडाक्याच्या हव्या हव्याशा आणि गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

'मी कांदा-लसूण खात नाही'; अर्थमंत्री सीतारमण यांचं वक्तव्य

महाविकास आघाडी सरकारचा आणखी धक्का, भाजप सरकारच्या काळातील कामांना स्थगितीचे आदेश

Uncertain Rainfall | पुढच्या 24 तासातही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज | ABP Majha