नवी मुंबई : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन करत आहे. या भूमीला माझा प्रणाम,'' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची मराठीतून सुरुवात केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन आणि जेनपीटीवरील चौथ्या टर्मिनलचं लोकार्पण करण्यात आलं. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

दरम्यान, अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकरच अवतरेल, असा दावाही मोदींनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्ती आणि दूरदृष्टीचं स्मरण मोदींनी केलं. त्याचबरोबर वेळेत कामं पूर्ण होणारी नवी संस्कृती आता रुजू होत असल्याचं सांगत, त्यांनी भाजप सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. दरम्यान, या क्रार्यक्रमावर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र बहिष्कार टाकला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.

लटकाना,अटकना, भटकना ही जुन्या सरकारची संस्कृती : मोदी


मोदींनी जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. जुन्या सरकारची संस्कृती ही लटकाना,अटकना, भटकना अशी होती. त्यामुळेच जवळपास 10 लाख कोटींचे प्रकल्प असेच अडकून होते, जे एनडीए सरकारने मार्गी लावले आणि त्यासाठी निधीची तरतूद केली. या सर्व प्रकल्पांचं काम वेगाने सुरु आहे, नवी मुंबई विमानतळ हे त्यापैकीच एक आहे, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, हाती घेतलेले प्रकल्प याच सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होतील, असं आश्वासनही मोदींनी दिलं.

पहिलं विमान 2019 ला उड्डाण घेईल : मुख्यमंत्री

या विमानतळाहून पहिलं विमान 2019 ला उड्डाण घेईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला. शिवाय येत्या काळात कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर दिला जाईल. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास केवळ 40 मिनिटात करता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

कसं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ?

1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारलं जाणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2019 ला पूर्ण होणार असून पहिलं विमान टेकऑफ होणार आहे.

सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करून त्यांना 2014 च्या पुनर्वसन आणि पुनर्वसन स्थापना धोरण कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 12 गावातील 3500 कुटुंबांपैकी सध्या 500 कुटुंबांचं इतरत्र स्थलांतरण करण्यात आलं आहे.

सिडकोने विमानतळाचं काम युध्दपातळीवर हाती घेतलं असून 2 हजार कोटी रुपयांचं काम चार कंपन्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M Mhatre , T J P L यांचा समावेश आहे. डोंगराचं सपाटीकरण करणं, भराव टाकून जमीन सपाट करणं, नदीचा प्रवाह बदलणं, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश आहे.

सिडकोने तीन टप्यात काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा आहे. दुसऱ्या टप्प्यात टप्पात अडीच कोटी आणि 2025 पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करीत एकूण 6 कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्य

  • 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

  • 1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारलं जाणार

  • एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचं वर्गीकरण

  • पहिल्या टप्यातील 2 हजार कोटी रूपयांचं काम सिडकोने हाती घेतलं

  • GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M Mhatre , T J P L या चार कंपन्या पहिल्या टप्प्यातील काम करणार

  • डोंगराचं सपाटीकरण करणं, भराव टाकून जमीन सपाट करणं, नदीचा प्रवाह बदलणं, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश

  • पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा