औरंगाबाद : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहिल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. औरंगाबादमध्ये आयाोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


औरंगाबाद येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच भरभरून कौतुक केलं. यावर आमदार अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलले ते मी ऐकले नाही. मात्र, राजकीय शिष्टाचार म्हणून या गोष्टी पाळाव्या लागतात. मिटकरी म्हणाले, की भाजपचे शिवसेने सोबतचे वर्तन पाहता भविष्यात अनेक वर्षे ते एकत्र येण्याचे संकेत नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेला डिवचण्याचं काम सुरू आहे, त्यावरुन तरी असे दिसत नाही. मात्र, मुख्यमंत्री देखील चांगलं काम करताय त्यामुळे ते राजकिय शिष्टाचार म्हणून बोलले असतील. मात्र, वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही, असं मिटकरी यांनी म्हटलंय.


मुंबई-नागपूर बुलेट हा प्रोजेक्ट राज्यासाठी महत्वाचा ठरेल आणि त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी आपले वजन वापरून त्यासाठी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दानवे जर पुढाकार घेत असतील तर राज्य सरकार त्याच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल असंही ते म्हणाले. रुळ सोडून धावू शकत नाही म्हणून मला रेल्वे आवडते असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.


मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा; उद्धव ठाकरेंचे आश्वासन


निजामकालीन शाळा नव्याने बांधणार
औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील असलेल्या 144 निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्यांची दुरावस्था झाली असून त्या नव्यानं बांधण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.


मराठवाड्यात संताची शिकवण सांगण्यासाठी संतपीठ हवंत असं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पैठण येथे संतपीठाचा अभ्यासक्रम सुरू करणार असून त्याची जबाबदारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे देण्यात येईल.  


राज्यात आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने औरंगाबाद आणि इतर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद दौऱ्यावर असून ते विविध कार्यक्रमात भाग घेणार आहेत.