मुंबई : विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाल्यानंतर, आता सत्ताधारी भाजप सत्तेत आल्यानंतर साडेतीन वर्षांनी विधानपरिषदेत सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष झाला आहे. भाजपचं संख्याबळ 21 झालं आहे, तर सत्ताधाऱ्यांचं एकूण संख्याबळ 40 म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त झालं आहे. परिणामी विधानपरिषदेत सत्ताधारी बहुमतात आले आहेत.


तर याआधी एक नंबरवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटलं असून आता त्यांच्या आमदारांची संख्या काँग्रेसएवढी म्हणजेच 17 झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असलेलं सभागृहाचं सभापती, उपसभापती ही पदं आता त्यांच्या हातातून जाऊ शकतात.

विधानपरिषदमध्ये भाजप संख्येने एक नंबरचा पक्ष झाला आहे. यामुळे भाजप, शिवसेना, मित्रपक्ष आणि अपक्ष यांचं संख्याबळ आता विरोधकांपेक्षा जास्त झालं आहे. त्यामुळे पुढील अधिवेशनात सभापती, उपसभापती या पदांवर सत्ताधारी दावा करण्याची शक्यता आहे. तेव्हा पुढील अधिवेशन हे आणखी वादळी ठरणार हे नक्की.

विधानपरिषदचे पक्षीय बलाबल
भाजप - 21
राष्ट्रवादी - 17
काँग्रेस  - 17
शिवसेना  - 12
जदयु - 1
आरपीआय कवाडे गट -01
रासप - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
रिक्त - 1
एकूण 78

सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ : भाजपाकडे 21, शिवसेना 12, रासप 1, अपक्ष आमदार 2 (भाजप समर्थक), अपक्ष आमदार 3 (शिवसेना समर्थक), पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने झालेली रिक्त झालेली एक जागा, अशी सत्ताधाऱ्यांचं 40 चे संख्याबळ.

विरोधकांचं संख्याबळ : काँग्रेस 17,  राष्ट्रवादीचे 17,  जनता दल युनायटेड 1, शेकाप 1, आरपीआय (कवाडे गट) 1, अपक्ष एक असे एकूण 38 संख्याबळ

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक, शिवसेनेचे दोन, रासप एक, शेकाप एक आणि भाजपचे चार उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षनिहाय उमेदवार 


भाजप - भाई गिरकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचा नातू), राम पाटील रातोळीकर
रासप - महादेव जानकर,
शिवसेना - अनिल परब, मनिषा कायंदे
काँग्रेस - शरद रणपिसे आणि डॉ. वजाहत मिर्झा
राष्ट्रवादी काँग्रेस - बाबाजानी दुर्राणी
शेकाप- जयंत पाटील