मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढलीय. त्यामुळे अर्थात राजकीय वर्तुळात मनसे-राष्ट्रवादी यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनाही सुरुवात झालीय.


आतापर्यंत मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिलाय. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्याप सहमती दर्शवण्यात आली नाहीय. मात्र, राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवल्याने त्यांची सहमती असल्याचे प्रथमदर्शन दिसून येतेय. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपची देशात सुरु असलेली विजयी घोडदौड पाहता, देशातील विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विरोधकही एकीने लढण्याच्या तयारीचे संकेत देत आहेत.

आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमोर ठेवलेल्या प्रस्तावानुसार, मनसेला सोबत घेण्याची विनंती केलीय. आगामी विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायला हवं. शहरी भागात मनसेची पकड मजबूत आहे. त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो, असे राष्ट्रवादीकडून प्रस्तावात म्हटले आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं. मात्र, काँग्रेसने अद्याप या प्रस्तावाला समर्थन दिले नाहीय.

सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावामागे दोन कारणं आहेत. राज्यातील शहरी भागात काँग्रेस-राष्ट्रवादीची संघटना मजबूत नाही. मात्र, याच भागात मनसे मजबूत स्थितीत आहे. मनसेची बरीचशी ताकद मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये टिकून आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्या अशा शहरांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा आणि भाजप-शिवसेनेला नुकसान होण्याची शक्यता आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेला सोबत घेतलं, तर या युतीचा राज्यातील विधानसभेच्या 25 जागांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शिवसेना-भाजपला शहरी भागात जी मराठी जनतेची मतं मिळतात, त्यात मनसे विभाजन करु शकते.

आपल्या राजकीय अस्तित्त्वासाठी झटत असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या युतीमुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला नवी व्होटबँक मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे ही नवी समीकरणं होऊ पाहत आहेत. राज ठाकरे कधी शरद पवारांसोबत गुप्त बैठका घेतात, तर कधी जाहीरपणे मुलाखत घेतात. शिवाय, व्यंगचित्राच्या माध्यमातून नरेंद्र मोदी, भाजप यांच्यावर फटकारे ओढत असतात. काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदलाही राज ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिला होता. शिवाय, आपल्या भाषणांमधून सुद्धा राज ठाकरे कायम आवाहन करत असतात की, भाजपविरोधात सर्वांनी एकत्र व्हायला हवं. या सर्व गोष्टींवरुन विरोधकांमध्ये अंतर्गत नव्या समीकरणांची बांधणी सुरु असल्याच्या शंकेला बळ मिळतं.

मात्र, मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस अद्याप तयार असल्याचे दिसत नाही. मनसेला सोबत घेतल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये आपल्या मतांवर परिणाम होईल, अशी भिती काँग्रेसला आहे. कारण महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका कायमच उत्तर भारतीयांच्या विरोधात राहिली आहे.

2019 साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जर मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी खांद्याला खांदा लावून लढले आणि शिवसेना –भाजप यांची युती झाली नाही, तर नरेंद्र मोदींच्या विजयरथाला महाराष्ट्रात मोठा अडथळा निर्माण होईल, यात शंका नाही.