नवी मुंबई : आधुनिक आणि विविध उपक्रम राबवून देशात आपले नाव नेहमीच अव्वल ठेवणाऱ्या नवी मुंबई मनपाने आता लोकांच्या घरातील खराब चप्पल, बूट, सँडल, गोळा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जुन्या चप्पल कचऱ्यात जाऊन त्यातील सिथेंटिक मटेरिअल, प्लास्टिक, फोम याचे कंपोस्टिंग होत नसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यावर उपाय काढत जुनी पादत्राणे गोळा करुन त्याचं रिसायकल करण्यात येत आहे. यातून तयार झालेल्या नवीन चप्पल, बुटांचं शाळेतील लाखो मुलांना मोफत वाटप करण्यात येत असल्याने दुहेरी फायदा मिळत आहे.


शहरातील प्रत्येक घरात किमान तीन ते चार जोड जुन्या चपला, बूट, सँडल मोठ्या प्रमाणात कपाटात साठवलेले पाहायला मिळतात. लहान मुलांचे वय वाढलं की त्याला हौसेपोटी घेतलेले चमकदार शूज तसेच अडगळीत पडून राहतात. अखेर कपाटातील जागा संपली की हे जुने सामान कचऱ्याच्या डब्यात सर्रास फेकून दिले जातं. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे जुनी पादत्राने कचऱ्यात न टाकण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे. याबाबत शहरातील सोसायट्यांमध्ये जनजागृती करुन घराघरात जात पालिका कर्मचारी जुनी पादत्राणे गोळा करत आहेत. महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमाला रहिवाशांनी चांगला प्रतिसाद देत याचे कौतुक केलं आहे.

रोज शहरातील हजारो घरातील जुने पादत्राणे कचऱ्यात जात असल्याने त्यातील सिथेंटिक मटेरिअल, प्लास्टिक, फोम यांची विल्हेवाट लागत नसल्याने त्याचं विघटन होत नाही. कचऱ्यात तसेच साचून राहिल्याने यातून काही महिन्यात केमिकलयुक्त रसायन बाहेर पडून याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. यातून सुटका करण्यासाठी नवी मुंबई मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी जुनी पादत्राणे पालिकाच गोळा करेल असा उपक्रम हाती घेतला. महापे एमआयडीसी मध्ये असलेल्या ग्रीन सोल कंपनीबरोबर समन्वय साधत जुन्या पादत्राणांवर रिसायकल करण्यात येत आहे.

ग्रीन सोल कंपनीच्या माध्यमातून गोळा झालेल्या जुन्या पादत्राणावर प्रक्रिया करण्यात येते. यातील सामानाचा वापर करत नवीन पर्यावरणपुरक लहान मुलांचे चप्पल, सँडल, बूट तयार करण्यात आले आहेत. आदिवासी पाडे, अनाथालय अशा शाळांमध्ये मोफत वाटप करण्यात येत आहे. देशात 15 राज्यातील लाखो विद्यार्थांना याचं वाटप करण्यात येत आहे.