ठाणे : मुंब्रा प्रभाग समिती ठाण्यातील अतिशय कमी जागेत दाट लोकसंख्या असलेला विभाग. तब्बल साडेसात लाखांपेक्षा जास्त लोकं एकट्या मुंब्रा प्रभाग समितीत राहतात. त्यामुळे चार एप्रिलला ज्यावेळी पहिला रुग्ण मुंब्र्यातील अमृतनगर येथे आढळला. त्यावेळी सर्वांच्याच मनात भीती निर्माण झाली. काहीच आठवड्यात मुंब्रा हे कोविड19 चे हॉटस्पॉट बनले. रोज दिवसाला सर्वाधिक रूग्ण याच प्रभागातून येऊ लागले. मात्र, आता परिस्थिती पूर्णतः बदलली असून रोज सर्वात कमी रुग्ण या प्रभाग समिती आढळत आहेत.


हा चमत्कार झाला कसा, असाच प्रश्‍न सर्वांना पडला आहे. मात्र, ठाणे महानगरपालिका, स्थानिक पोलिस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. इतकं मोठं आव्हान असलं तरी मुंब्रा प्रभाग समितीतील सर्व अधिकाऱ्यांसह साठ कर्मचाऱ्यांनी मुंब्रा कोरोना मुक्त करण्यासाठी कंबर कसली. पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून त्याच्या घराच्या आसपासचा अडीचशे मिटरचा परिसर सील करण्यास सुरुवात केली गेली. बिल्डींगच्या बाहेर कुणीही पडू नये यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक बिल्डीँगच्या गेटला टाळे ठोकले. आसपासचा सर्व परिसर सील केला. नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले गेले.


पाच नोडल ऑफिसर
मुंब्रा विभागात रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी पाच नोडल ऑफिसर नेमले गेले. यापैकी चार जणांना ठरवून कामे दिली गेली. तर उर्वरित एकाला या सर्वांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम दिले गेले. त्यामुळे प्रत्येकाने आपले काम चोखपणे पार पाडले. स्थानिक राजकीय पक्षांच्या मदतीने कोविड वॉरियर्स नेमण्यात आले. यांच्या मदतीने घराघरात जाऊन सर्वे केला गेला. या वॉरियर्सला स्थानिकांची माहिती असल्याने एखादा रुग्ण लक्षणं लपवत असल्यास त्यांना शोधण्यात मदत झाली.


मुंब्रा इथल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट लोकांसाठी जवळचं नवीन क्वॉरंटाईन सेंटर


पालिकेने फिवर क्लिनिक आणि वेगवेगळी आरोग्य यंत्रणा उभारली असली तरी नागरिक मात्र घाबरून पालिका रुग्णालयात जात नव्हते. त्यामुळे स्थानिक डॉक्टरांची आणि डायग्नोसिस सेंटरची मदत घेतली गेली. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांचा दररोजचा डेटा तपासून रुग्णांना शोधण्याचे काम केले गेले. मुंब्रा येथून पालिकेचे क्वॉरंटाईन सेंटर अतिशय लांब, भाईंदर पाडा येथे असल्याने अनेक नागरिक घाबरून घरीच बसले होते. त्यामुळे मुंब्रा इथल्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट लोकांसाठी जवळचे नवीन क्वॉरंटाईन सेंटर उभारले गेले.


मुस्लीम बहुल या विभागात रमझानच्या महिन्यात सर्वात जास्त त्रास पालिका आणि पोलिसांना झाला. त्यावर उपाय म्हणून या विभागात असलेल्या मौलाना आणि मशिदितील धार्मिक गुरूंची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून नागरिकांना घरी बसून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले गेले. त्यामुळे मोठा फरक पडला. कौसा स्टेडियममध्येच लक्षणे नसलेल्या आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी 200 खाटांचे कोविड केअर सेंटर बनवण्यात आले. त्यामुळे लांबवर असलेल्या हॉस्पिटलची भीती कमी होऊन अनेक रुग्ण स्वतःहून पुढे आले.


असे वेगवेगळे उपाय करुन देखील येथील नागरिक शासनाच्या नियमांना जुमानत नव्हते. नियम भंग करुन रस्त्यावर गर्दी करणे, मास्क न लावता फिरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणे, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांशी वाद घालणे, त्यांच्याशी मारामारी करणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली गेली.


सर्वात पहिल्यांदा एसआरपीएफच्या तीन तुकड्या याच मुंब्रा प्रभाग समितीत आणाव्या लागल्या होत्या. जेणेकरून पोलिसी कारवाईला लोक घाबरतील आणि घरी बसतील. नागरिकांवर वचक बसवताना मुंब्रा पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी देखील जिवाचे रान केले. अनेक पोलिस कर्मचारी स्वतः कोविड19 पॉझिटिव्ह निघाले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे देखील पॉझिटिव्ह निघाले. मात्र, उपचार घेऊन ते पुन्हा याच पोलीस स्टेशन मध्ये रुजू झाले. आज मुंब्र्यात कमी झालेल्या रुग्णसंख्यासाठी मुंब्रा पोलिसांचे देखील अथक परिश्रम आहेत.


त्याचप्रमाणे स्थानिक आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, तसेच स्थानिक नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनीदेखील प्रशासनाला मदत केली. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली. या सर्व एकत्रित आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे सध्या मुंब्रा हे सर्वात कमी नवीन रुग्ण सापडणारे प्रभाग झाले आहे. सध्या इथे दिवसाला 100 पेक्षा जास्त चाचण्या केल्या जातात. तरीदेखील मागच्या काही दिवसातील आकडेवारी बघितली तर ती दिलासादायक वाटते.


13 जुलै - 7 रुग्ण
12 जुलै - 2 रुग्ण
11 जुलै - 16 रुग्ण
10 जुलै - 8 रुग्ण
9 जुलै - 11 रुग्ण
8 जुलै - 10 रुग्ण
7 जुलै - 3 रुग्ण
6 जुलै - 8 रुग्ण
5 जुलै - 9 रुग्ण
4 जुलै - 6 रुग्ण
3 जुलै - 15 रुग्ण
2 जुलै - 4 रुग्ण
1 जुलै - 19 रुग्ण


रुग्ण दुपटीचा कालावधी 104 दिवसांवर


14 जून म्हणजेच एक महिन्यापूर्वी मुंब्रा येथील रुग्ण दुपटीचा कालावधी हा 37 दिवसांचा होता, तर मृत्यु दर हा 3.9 टक्के इतका होता. आता एक महिन्यानंतर तोच रुग्ण दुपटीच्या कालावधी एकशे चार दिवसांवर पोचला तर मृत्यूदर हा तीन टक्क्यांवर येऊन पोचला आहे. आधीच मुंब्रा विभागाकडे बघण्याची सर्वांची दृष्टी थोडी वाईटच असते. त्यात covid-19 चा हॉटस्पॉट बनल्याने सर्वत्र टीका देखील होऊ लागली होती. मात्र, आज मुंबईला विभाग आता सर्वात कमी रुग्ण संख्येमुळे चर्चिला जात आहे.


BJP | मुंबई मनपाला दिलेले व्हेन्टिलेटर्स वापरात नाहीत, भाजपचा आरोप