Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. या अटींचे पालन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना करावे लागणार आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे. 


कोर्टाच्या अटी कोणत्या?


मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर करताना कठोर अटी घातल्या आहेत. या पाच अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.  प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितक्याच रकमेचे हमीदार देण्याच्या अटीची पूर्तता केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. 


कोर्टाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्याशी निगडीत बाबींवर राणा दाम्पत्याला भाष्य करता येणार नाही. त्याशिवाय पोलिसांच्या तपासाता अडथळे आणायचे नाहीत असेही कोर्टाने आदेश दिले आहेत. या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. कोर्टाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे. 


प्रकरण काय?


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर जमत घोषणाबाजी केली. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली.


तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.