Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे. 


Mumbai Rape Case :  साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू


माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी-फडणवीस


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साकीनाक्यात घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. ज्याप्रकारे गेल्या महिन्याभरात बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. राज्यात विविध ठिकाणी अशा घडत आहेत. अतिशय भयंकर अशा या घटना आहे. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात अशा घडल्यानं लौकिकाला धक्का पोहोचतो. हा प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावं. आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. शक्ति कायद्यासंदर्भात बैठकांवर बैठका चालल्या आहेत. अशा केसेस फास्टट्रॅक कोर्टातही चालवल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाला अशी विनंती करावी, असंही ते म्हणाले. महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यासाठी सरकारला वेळ नाही, असं ते म्हणाले. 


आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ


पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भावनिक होत म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. या प्रकरणात तिचा काय दोष होता. हे एका माणसाचं काम नाही. तिला काय वेदना झाल्या असतील पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. सरकारसाठी हा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. आम्ही फक्त घोषणा करु शकतो बाकी काही नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.


 शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं- प्रवीण दरेकर 
सरकारनं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी चर्चा करून कारवाई करावी. राज्यात काय चाललंय एकामागोमाग एक घटना होत आहेत .  आम्ही काही बोललो का बोलायचं की आम्ही राजकारण करतो  हे योग्य नाही राज्यात कायद्याचा धाक राहिला नाहीय.  शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं, असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.  


Mumbai Rape Case :  साकीनाका अत्याचार पीडित महिलेची मृत्युशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू


या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.


मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण


कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.


फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला पाहिजे- नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ही दुःखद घटना आहे, यामध्ये चार्टशीट लवकर दाखल झाली पाहिजे. लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला पाहिजे. सरकार त्यादृष्टीने पावले टाकत आहेत. या घटनेचे समर्थन कुणी करत नाही आणि जो आरोपी आहे त्याला देखील वाचवायचा प्रयत्न कोणीही करत नाही. विरोधक प्रश्न विचारतात हे त्यांचे काम आहे. मात्र जे प्रश्न विचारतात त्यांच्या पक्षात इतर राज्यात ज्या घटना घडल्या त्यामध्ये कुठल्या प्रकारे सरकारने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला हे जनतेच्या समोर आहे. मात्र हे सरकार तसे करत नाही, निश्चित पणे मुंबई अजूनही सुरक्षित आहे, ही घटना घडली ते दुःखद आहे, मात्र आरोपी वाचणार नाही, सरकार फास्ट ट्रॅक खटला चालवेल, असं नवाब मलिक म्हणाले.


आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.