मुंबई : भारतात अद्यापही लैंगिक संबंधांबाबत उघडपणे बोललं जात नाही. जिथे विभिन्न लिंगी सेक्सबद्दलही दबक्या आवाजात चर्चा होतात, तिथे समलिंगी, उभयलिंगी, ट्रान्सजेंडर समुदायातील नागरिकांची बातच सोडा. मात्र लिंग परिवर्तन केलेले दोन जीव एकमेकांवरील प्रेमापोटी आयुष्यभरासाठी एकत्र आले आहेत. लिंगबदलानंतर स्त्रीचा पुरुष झालेल्या व्यक्तीने लिंगबदल करुन पुरुषाची स्त्री झालेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.


46 वर्षीय आरव अप्पूकुट्टन याने 22 वर्षीय सुकन्या कृष्णनशी लग्नगाठ बांधायचं ठरवलं आहे. 'स्टोरीपिक'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. खरं तर या दोघांची कहाणी फारच रंजक आहे. केरळमध्ये जन्माला आलेल्या बिंदूला आपण स्त्रीच्या शरीरात अडकलेला पुरुष आहोत, याची जाणीव झाली. अखेर तिने सेक्स चेंज ऑपरेशन करायचं ठरवलं.

दुसरीकडे, चंदू म्हणून जन्माला आलेल्या तरुणाची आपलं शरीर पुरुषाचं असलं, तरी महिला असल्याची भावना बळावली होती. याच जाणीवेतून चंदूनेही लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

तीन वर्षांपूर्वी बिंदू आणि चंदू दोघंही योगायोगाने एकाच वेळी सेक्स चेंज ऑपरेशनसाठी मुंबईतील रुग्णालयात आले. चंदूला नातेवाईकाचा फोन आला आणि तो मल्ल्याळम भाषेत बोलू लागला. त्याचवेळी बाजुला बसलेली एक महिलाही फोनवर मल्ल्याळममध्ये बोलत होती. परक्या शहरात मल्ल्याळम भाषेचा दुवा जुळला आणि एकाच शहरातून आल्याचं त्यांना समजलं.

आधी बिंदू, आता आरव

डॉक्टरांकडे तीन तास वाट बघणं त्यांच्या पथ्यावर पडलं. एकमेकांना जाणून घेण्यासाठी तो वेळ पुरेसा ठरला. त्यांनी एकमेकांचं फोन नंबर घेतले. बोलणं वाढत गेलं, मैत्री खुलत गेली... काळाने किमया केली आणि बिंदू-चंदूच्या भेटीगाठी वाढू लागल्या. बिंदू खरं तर 22 वर्षीय चंदूच्या वयापेक्षा दुपटीने मोठी. मात्र वय, लिंग अशा कुठल्याच मर्यादा त्यांच्या प्रेमाच्या आड कधीच आल्या नाहीत.

मधल्या काळात बिंदूचा आरव झाला, तर चंदूची सुकन्या. मूळगावी परतल्यानंतरही दोघं एकमेकांच्या शस्त्रक्रियेबद्दल तासनतास बोलायला लागले. सुरुवातीला आठवड्यातून एकदा होणारे फोन, दोनदा-तीनदा व्हायला लागले. हळूहळू रोजच त्यांच्या गप्पा सुरु झाल्या.

पुढच्या महिन्यात दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. एका मंदिरात विधीवत विवाह करण्याची त्यांची इच्छा आहे. आरव आणि सुकन्या यांच्या कुटुंबीयांचा त्यांना पाठिंबा आहे. दोघांनी भविष्याचं प्लॅनिंग केलं आहे. सर्जरीनंतर गर्भधारणा शक्य नसल्याने मूल दत्तक घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.