मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या परिवारावर सुरु असलेली आरोपांची मालिका थांबण्याचं नाव घेईना. काही दिवसांपूर्वी मलिकांनी हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी दिली होती. पण सोमवारी (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मलिकांनी समीर वानखेडे 'चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे' अशी टीका केली. ज्यानंतर समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी नवाब मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात तक्रार दाखल केली. ज्यानंतर मुंबई कोर्टानेही मलिकांना सुनावलं आहे. तसंच कोर्टाला वानखेडेंबाबत कोणतंही विधान करणार नाही, अशी हमी देऊनही टिका केल्याने मलिकांना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.


काही दिवसांपूर्वीच एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आले होते. आता या प्रकरणी 9 डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे. दरम्यान हायकोर्टातील पुढील सुनावणीपर्यंत वानखेडेंबाबत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी नवाब मलिकांनी हायकोर्टात दिली होती. पण त्यानंतरही आता मलिकांनी वानखेडेंवर मलिकांनी टीका केली आहे. 


नेमकं चैत्यभूमीवर काय घडलं?


महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं घेतली. यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले. “मी जो संघर्ष सुरु केला त्याचा जय भीम इम्पॅक्ट सुरु झाला आहे,” असं वाटतं असंही ते म्हणाले आहेत. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.



संबंधित बातम्या