मुंबई : वांद्रे वरळी सी लिंकवरुन (Bandra Worli Sea Link) 28 वर्षीय तरुणाने उडी मारत आत्महत्या (Sucide) केल्याची माहिती समोर आली आहे. आकाश सिंह असं या तरुणांचं नाव असून तो एका खासगी बँकेत कर्मचारी म्हणून काम करत होता. शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास त्याने वांद्रे वरळी सी लिंकवरुन उडी मारली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी आकाशचे त्याच्या मैत्रीणीसोबत ब्रेकअप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. 


शनिवार रात्री 11.45 च्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहचल्यानंतर आकाशला मृत घोषित करण्यात आले. आकाशने उडी मारल्यानंतर समुद्रात आकाशला शोधण्यासाठी वरळी पोलिसांची बोट, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमार बोटींचा सहभाग होता. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून सध्या पुढील तपास सुरु आहे. 


वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात


वरळीहून (Worli) वांद्र्याच्या दिशेनं भरधाव वेगात इनोव्हा कार जात होती. इनोव्हा कारमधून सहा प्रवासी प्रवास करत होते. ही इनोव्हा कार सर्वात आधी सी-लिंकवर मर्सिडीज गाडीला धडकली. त्यानंतर सुसाट वेगानं तिथून निघून गेली. पुढे जाऊन या कारनं वांद्रे सीलिंकवरील टोलनाक्यावर टोल भरत असलेल्या इनोव्हा आणि क्विड गाडीला पाठीमागून जोरदार धडक मारली. इनोव्हा गाडीच्या पाठोपाठ होंडा सिटी कारनंही इनोव्हा गाडीला धडक देत, वांद्रा-वरळी सी लिंकवरील टोल नाका 11 आणि 10 वरुन जाणाऱ्या टॅक्सिला धडक दिली. अचानक झालेल्या विचित्र अपघातामुळे सर्वजण पुरते घाबरले होते. 


वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातानंतर तात्काळ टोलनाक्यावर उपस्थित कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीनं सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आलं. अपघातात हनिफ पिर, ,हमाबीबी पिर ,खतीजा हटिया या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, असीम सदर, ,हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे, अशी जखमींची नावं आहेत. अद्याप सर्व जखमींची नावं कळू शकलेली नाही. सर्व जखमींवर मुंबईतील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून चौकशी सुरू आहे. 


हेही वाचा : 


आधी मर्सिडीजला धडक, पळून जाताना इतर गाड्याही उडवल्या; वांद्रे-वरळी सी-लिंकवरील अपघात प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा